आदिवासी ग्रामस्थांची गैरसोय टळली
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात यावर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावत आहे. त्यात पाथरज ग्रामपंचायतमधील नागेवाडीमधील पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. वाडीमधील आदिवासी लोक आणि महिलांना काही किलोमीटर अंतर पायी जाऊन पाणी आणावे लागत होते. मात्र, त्या भागातील आदिवासी लोकांसाठी बोअरवेल खोदून दिली आणि त्यानंतर आता त्या बोअरवेलमधील पाणी विहिरीमध्ये टाकण्यात आले. दरम्यान, गावाजवळ पाणी आल्याने आदिवासी महिलांची पाण्यासाठी पायपीट थांबली आहे. नागेवाडीमधील 600 लोकवस्तीच्या आदिवासी वाडीमध्ये असलेल्या पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणार्या दोन्ही विहिरी आटल्या आहेत. त्यामुळे येथील आदिवासी महिलांना डोक्यावर हांडे घेऊन रणरणत्या उन्हात डोंगरपाडा येथील पुलावर यावे लागत होते.त्याबाबत समाज माध्यम आणि वृत्तपत्रांनी दखल घेतल्यावर कशेळे गावातून सामाजिक कार्यकर्ते भास्कर दिसले यांनी नागेवाडीमध्ये बोअरवेल खोदणारी गाडी नेली. ग्रामस्थांचे सल्ल्याने बोअरवेल खोदली असता 450 फुटावर भरपूर पाणी लागले.त्यामुळे या वाडीमधील आदिवासी लोकांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर झाली.