Water Scarcity: गाव-वाड्यांना टँकरचा आधार

कर्जत तालुक्यातील पाण्याची स्थिती बिकट

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यात प्रचंड उष्म्याने सर्वत्र पाण्याची टंचाई वाढली आहे. तालुक्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागातील पाण्याचे स्तोत्र यांनी तळ गाठला आहे. त्यामुळे आजच्या घडीला तालुक्यात 21 गावे आणि वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. दरम्यान पाण्याची टंचाई वाढत असून टँकरची मागणी वाढत असल्याची माहिती कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी दिली असून 12 टँकरचा वापर सध्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी केला जात आहे.

कर्जत तालुक्यात दरवर्षी मार्च महिना सुरू झाला की पाणीटंचाई जाणवू लागते. तालुक्यातून टाटा धरणाच्या पाण्यावर पेज नदी उल्हास नदीला मिळेपर्यंत बारमाही वाहते. मात्र त्याआधी उल्हास नदी कोरडे असते. तसेच तालुक्यातून वाहणाऱ्या चिल्हार, पोश्री या मोठया नद्या उन्हाळ्यात कोरड्या असतात. त्याचवेळी अनेक उपनद्या या उन्हाळ्यात कोरड्या असल्याने तालुक्यात पाणीटंचाईचे दुर्भिक्ष्य उन्हाळा सुरू झाला की अधिक प्रमाणात जाणवते. त्यात जलजीवन मिशन योजनेचे अनेक नळपाणी योजना निधीअभावी रखडल्या आहेत. हे लक्षात घेऊन पाणीटंचाई आराखडा डिसेंबर 2025 मध्ये तयार करण्यात आला आहे. यावर्षी कर्जत तालुक्यातील 20 गावे आणि 39 आदिवासी वाड्या या पाणीटंचाई ग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. या सर्व पाणीटंचाईग्रस्त भागातील पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी शासनाने टँकरचे माध्यमातून पाणी पुरवठा सुरू करण्याचे पाणीटंचाई कृती आराखड्यात नमूद केले होते. तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायतमधील अशाणे गावात गतवर्षी पहिला शासकीय टँकर सुरू झाला होता. यावर्षी देखील पहिला शासकीय टँकर अशाणे गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सुरू झाला आहे. शासनाने जिल्हाधिकारी स्तरावर टँकर निविदा मागवली होती, त्यानुसार कर्जत तालुक्यासाठी 12 टँकर मंजूर झाले असून त्या टँकरमध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता ही 14 हजार लिटर एवढी आहे. त्या टँकरमधून पाणी टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा केला जाणार आहे. सध्या तालुक्यातील सात गावे आणि 12 वाड्या यांना टँकरमधून पाणी दिले जात आहे. तालुक्यातील पेज आणि उल्हास नदीमधून पाणी उचलले जात आहे.

'या' गावांचा समावेश
कर्जत तालुक्यातील आशाणे, कोषाने, पळसदरी, पाथरज, मोगरज, खानंद, धामणी या गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तर किरवली ठाकूरवाडी, सावरवाडी ठाकूरवाडी, पळसदरी ठाकूरवाडी, वर्णे ठाकूरवाडी, चिमटे वाडी, जांभूळ वाडी, झुगरेवाडी, किरवली, पेटारवाडी, लोभेवाडी, पिंगळस, फणसवाडी, भक्तची वाडी, सराईवाडी, पाच खडकवाडी, मोहपाडा, मेचकरवाडी, धोत्रेवाडी आणि बणाचीवाडी या 13 वाड्यांमध्ये शासकीय टँकरमधून पाणीपुरवठा केला जात आहे.
Exit mobile version