शासनाच्या दोन टँकर मधून पाणीपुरवठा
। नेरळ । प्रतिनिधी ।
उन्हाचे चटके वाढले असून तालुक्यात मोठ्या प्रमाणात गावात आणि आदिवासी वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यासाठी खासगी संस्थेच्या माध्यमातून किमान 20 गावे आणि वाड्यांना पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. तर, पाच गावे आणि चार वाड्यांना शासकीय टँकर मधून पाणी पुरवठा सुरु आहे. दरम्यान, तालुक्यातील चार ठिकाणी येत्या काही दिवसांत शासनाच्या टँकरमधून पाणी पुरवठा करण्याचे नियोजन पंचायत समितीकडून सुरु आहे. त्यात तीन आदिवासी वाड्या आणि एका गावाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती पंचायत समितीकडून देण्यात आली आहे.
पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाच्यावतीने पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला जातो. यावर्षी तालुक्यातील 18 गावे आणि 60 आदिवासी वाड्यांना पाणीटंचाई ग्रस्त गावे-वाड्या म्हणून शासनाने जाहीर केले आहे. यावर्षी तालुक्यात अनेक वर्षातील तीव्र पाणीटंचाई दिसून येत आहे. त्यामुळे (दि.1) एप्रिल रोजी शासनाचा पहिला टँकर सुरु झाला. आतापर्यंत तालुक्यात 12 हजार लिटर क्षमता असलेल्य शासनाच्या दोन टँकरमधून पाच गावे आणि चार आदिवासी वाड्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.
आतापर्यंत आषाणे, पिंगळस, मोग्रज, किरवली आणि खानंद या पाच गावात पिण्याचे पाणी टँकरमधून पुरविले जात आहे. तर, जांभूळवाडी, मेचकरवाडी, फणसवाडी आणि भक्ताची वाडीमध्ये शासनाच्या टँकरमधून पाणी पुरवठा सुरु केला आहे. मात्र, तरीदेखील कर्जत तालुक्यातील आणखी चार ठिकाणी शासनाने पिण्याचे पाणी टँकरमधून पुरविण्याचे प्रस्ताव कर्जत पंचायत समितीकडे पोहचले आहेत. किरवली वाडी, कोषाने आणि आषाणे वाडी तसेच वर्णे येथे पाणी पुरविण्याचे प्रस्ताव कर्जत पंचायत समितीकडे आले आहेत. त्या सर्व ठिकाणी उप विभागीय अधिकारी यांच्या मान्यतेने याच आठवड्यात पाण्याचे टँकर सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दुसरीकडे कर्जत तालुक्यात सुधाकर घारे फाउंडेशनकडून साधारण 12 टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था टँकर पाठवून केली जात आहे. तर, आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनकडून 11 पाणीटंचाई असलेल्या गावे वाड्यांमध्ये टँकर पाठवून तहान भागविली जात आहे. त्यामुळे कर्जत पंचायत समितीवर टँकर ने पाणी पुरविण्याचा बोजा काहीसा कमी झाला आहे.