। नेरळ । प्रतिनिधी ।
रेल्वे आणि रेल्वे संरक्षण दलाने एक जुलैपासून मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवर आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळ आणि सोलापूर विभागांमध्ये बाईक रॅली सुरू आहे. या रॅलीचे कर्जत रेल्वे स्थानकातर्फे आरपीएफ आयपीएफ अनिल वर्मा, उपनिरीक्षक मगन खिलारे तसेच जय अंबे माध्यमिक विद्यालयाने हार घालुन स्वागत केले.
मध्य रेल्वेचे मुंबई मंडळाचे सुरक्षा आयुक्त जितेंद्र श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या बाईक रॅलीचे नुकतेच कर्जत रेल्वे स्थानक येथे आगमन झाले. रॅलीमध्ये एकुण पाच बुलेट गाड्या आणि दहा जवान सहभागी झाले होते. बाईक रॅलींमध्य रेल्वेवरील एकूण 1665 किमी अंतरावरील 43 स्थानके कव्हर केली. या सर्व बाइक रॅली मुंबई येथे एकत्र येतील आणि स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला नवी दिल्लीला पोहचणार आहे.कर्जत येथून बाईक रॅलीचे बदलापुरकडे प्रस्थान झाले. सदर प्रसंगी आरपीएफ आयपीएफ अनिल वर्मा, सहायक पोलीस निरीक्षक आर.सी. कुंतल, सहायक उपनिरीक्षक गायकवाड,तसेच रेल्वे कमर्चारी यांनी शुभेच्छा दिल्या.