अलिबाग मुरुड मतदारसंघातील जनेतत चर्चा
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
थळ गट ग्रामपंचयातीमधील गेल्या अनेक वर्षांपासूनच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवू न शकल्याने सलग दोन दिवस ग्रामस्थांचे आंदोलनाच्या बातम्यांमुळे अलिबाग मुरुड मतदार संघात स्थानिक आमदारांच्या कार्यक्षमतेबाबत सोशल मिडीयात जोरदार चर्चा सुरु असून गावात पाणी पुरवू न शकणारे आमदार काय विकास करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान थळ चाळमळा येथील महिला गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपल्या समस्यांचे गार्हाणे मांडणारे असल्याचे सांगण्यात आले.
अलिबाग मुरुडच्या स्थानिक शिवसेना आमदारांचे वर्चस्व असणार्या थळ गट ग्रामपंचायत हद्दीतील थळ बाजार कोळीवाडा आणि थळ चाळमळा येथील महिला सोमवार व मंगळवार अशा सलग दोन दिवसात पाण्यासाठी आक्रमक झाले होते. पाणी मागणार्या ग्रामस्थांविरोधात खोटी तक्रार केल्यानंतर त्याविरोधात संतप्त झालेल्या ग्रामस्थांसोबत पोलिस ठाण्यात बैठक घेण्यात आली. अलिबाग पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर चार दिवसात पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देणार्या सरपंच उपसरपंचानी नंतर मात्र आपले शब्द फिरवित काही दिवसांनी पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचे सांगितले. तर दुसर्या दिवशी मंगळवारी चाळमळा कोळीवाडा येथील महिलांनी पाण्यासाठी थळ ग्रामंपचायतीच्या कार्यालयात जाऊन ठिय्या आंदोलन केले. यावेळी महिलांचा संतापाची चाहूल लागल्याने सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवकांनी त्यांना सामोरे जाण्याऐवजी पळ काढला. तसेच आपले फोन देखील बंद ठेवले. त्यामुळे महिलांच्या संतापात वाढ झाली. तीन चार तास महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयात वाट पाहिल्यानंतर देखील दखल घेतली न गेल्याने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपले गार्हाणे मांडण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, वर्तमानपत्रांमधून या आंदोलनाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्या स्वतःच्या थळ या गावात पाणी पुरवू न शकणारे आमदार मतदारसंघाचा काय विकास करणार असा सवाल सोशल माध्यमांद्वारे रायगड जिल्ह्यातील जनतेतून केला जात आहे.