खासादार बारणे यांच्याबद्दल नाराजी
। नेरळ । प्रतिनिधी ।
मध्य रेल्वे लाईनवरील कर्जत रेल्वे स्थानकात पूर्वी असलेले थांबे कोवीडमध्ये रद्द करण्यात आले. ते थांबे पुन्हा सुरू करण्याचे काम लोकप्रतिनिधी आणि प्रवासी संघटना करणार आहेत की नाही, असा प्रश्न सर्वसामान्य प्रवासी विचारत आहेत. तर लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्या पुन्हा सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधी स्वारस्य दाखवणार आहेत का, असा प्रश्न प्रवासी करत आहेत. दरम्यान, खासदार बारणे यांच्याकडून त्या बंद गाड्या सुरू करण्यासाठी आणि रद्द केलेले थांबे पुन्हा सुरू करण्यासाठी कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने प्रवासी नाराज आहेत.
कर्जत हे रेल्वे स्थानक पुणे घाट माथ्यावर जाण्यापूर्वीचे महत्वाचे स्थानक आहे. पुण्याकडे जाणार्या प्रत्येक गाडीला मागे डबल इंजिन लावण्याची गरज असते आणि कर्जत ते लोणावळा या भागात अशी बँकर काम करीत असतात. त्या कर्जत स्थानकात पुणे भागातून येणार्या बहुसंख्य गाड्यांना प्रवासी थांबे होते. तर कर्जत येथे मुंबईकडून येणार्या गाड्यांना कर्जत हा अधिकृत थांबा होता. मात्र, रेल्वे प्रशासनाने कोविड काळात प्रवासी संख्या रोडावली असल्याने प्रवासी थांबे कमी केले होते. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत होते आणि प्रवाशांना पुणे येथून कर्जतकडे येताना एकतर लोणावळा येथे उतरावे लागत होते किंवा कल्याण येथे उतरून पुन्हा कर्जत भागात यावे लागत आहे. ही परिस्थिती कोवीड संपून दोन वर्षे लोटल्यानंतर देखील कायम आहे. पूर्वी कर्जत येथे थांबा असलेल्या गाड्या कर्जत येथे पुन्हा थांबाव्यात यासाठी स्थानिक प्रवासी संघटनेकडून या भागातील लोकप्रतिनिधीकडे सातत्याने मागणी केली गेली. मात्र, मावळ लोकसभेचे सदस्य खासदार श्रीरंग हे बंद केलेले थांबे पुन्हा सुरू करू शकले नाहीत. रेल्वे राज्यमंत्रींकडे देखील कर्जत येथील भाजप कार्यकर्ते पदाधिकारी यांनी धाव घेतली. मात्र, त्यावेळी रावसाहेब दानवे यांनी आश्वासन देवून देखील बंद केलेले प्रवासी थांबे तसेच बंद झालेल्या गाड्या देखील पुन्हा सुरू झालेल्या नाहीत. ही परिस्थिती सुधारण्यासाठी विद्यमान खासदारांकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे आरोप प्रवासी करीत आहेत.