| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यामध्ये रविवारपासून सलग तीन दिवस श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनारी चरस सदृश्य पदार्थाची 107 पाकीटे सापडली आहे. सुमारे साडेचार कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. चरस आणखी काही समुद्रकिनारी लागण्याची शक्यता असल्याने रायगड पोलीसांनी सागरी किनारे पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक मच्छीमार, ग्राम रक्षक दल, सागरी रक्षक दल, तटरक्षक दलाच्या मदतीने शोधाशोध पोलीस घेत आहेत. सागरी किनारी असलेल्या पोलीस ठाण्यामार्फत शोध मोहीम सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
रत्नागिरीमधील समुद्रकिनारी चरसची पाकीटे सापडल्याने रायगडच्या समुद्रकिनारी देखील चरसचा साठा सापडण्याची शक्यता असल्याने रायगड पोलीस दलामार्फत सागरी किनारी सर्च ऑपरेश सुरु केले. घटनेनंतर रायगड पोलीस यंत्रणा अधिक सर्तक झाली. सागरी किनारी कडक पहारा सुरु ठेवण्यात आला. मच्छीमार सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांसह संचालक मंडळाची बैठका घेऊन या चरसबाबत माहिती देण्याचे काम केले जात आहे. स्थानिक मच्छीमार, तटरक्षक दल, ग्रामरक्षक दल, पोलीस पाटील अशा वेगवेगळ्या यंत्रणेची मदत घेऊन सागरी किनारा पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. तसेच अन्य समुद्रकिनारीदेखील चरसची पाकीटे लागण्याची शक्यता असल्याने त्यांनादेखील सतर्क राहण्याचा इशारा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिला आहे. समुद्र किनाऱ्यासह, खाडी किनारी, कांदळवनाच्या परिसरातदेखील चरसची पाकीटे सापडण्याची शक्यता असल्याने स्थानिकांची मदत घेण्यात आली आहे. जर कोणाला पाकीटे दिसून आल्यास पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहनही पोलीसांकडून करण्यात आले आहे.
श्रीवर्धनमध्ये मुद्देमाल जप्त श्रीवर्धनमधील जीवना, मारळ, सर्वेसागर, कोंडीवली, दिवेआगर समुद्र किनारी तीन दिवसात 107 चरसची पाकीटे सापडली आहेत एकूण 4 कोटी 50 लाख रुपयांचा हा साठा असून श्रीवर्धन पोलीस ठाण्यात हा मुद्देमाल जप्त करून ठेवण्यात आला आहे.
रेवदंडा किनारी 11 बॅगा श्रीवर्धन किनारी सापडलेल्या चरसच्या बॅगा आता रेवदंडा किनारीही आल्याने येथे एकच खळबळ उडाली आहे. किनाऱ्यावर अकरा बॅगा सापडल्या आहेत. त्याची मोजदाद करण्याचे काम पोलिसांतर्फे सुरु झालेले आहे. अधिक तपशील प्राप्त होऊ शकला नाही. मात्र, हे चरस आणखी कुठे कुठे वाहून गेले आहे याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.