मुंबईतील लहरी हवामानाचा संपकर्‍यांना फटका

उन्हामुळे आंदोलकांना त्रास, आरोग्याच्या तक्रारींमुळे रुग्णालयात दाखल
। मुंबई । वृत्तसंस्था ।
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात आझाद मैदानातील एसटी संपकरी कर्मचार्‍यांना मुंबईतील लहरी हवामानाचा फटका बसला आहे. आतापर्यंत 20 कर्मचारी रुग्णालयात दाखल झाले आहेत. या सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
एसटीचे महामंडळात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी राज्यभरातून काही एसटी कर्मचारी आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. त्यापैकी 20 कर्मचार्‍यांना 14 ते 22 नोव्हेंबर दरम्यान विविध आरोग्याच्या तक्रारींमुळे सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये महिला, पुरुष आणि पन्नाशी उलटलेल्या कर्मचार्‍यांचा समावेश आहे. फिट येणे, छातीत दुखणे, ताप येणे, श्‍वास अडकणे, चक्कर येणे या लक्षणांमुळे या कर्मचार्‍यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती एसटी कर्मचार्‍यांनी दिली. या कर्मचार्‍यांची प्रकृती स्थिर आहे
रात्री पडणार्‍या पावसामुळे कर्मचार्‍यांचे प्रचंड हाल होत असून स्वतःला वाचवावे की सामान सुरक्षित ठेवावे, अशी कात्रीत संपकरी आहेत. अशातच सरकारकडून मागण्या मान्य होत नाही उलट कारवाईची संख्या वाढत असल्याने कुटुंबीयांची चिंता ही कर्मचार्‍यांना सतावत आहे. मागील तीन-चार दिवसांपासून रात्रीच्या वेळी पावसाने हजेरी लावल्याने तसेच दिवसा कडक उन्हामुळे आंदोलकांना त्रास होत आहे. हवामानातील बदलामुळे संप करणारे कर्मचारी आजारी पडत आहेत.
मैदानातील आंदोलकांचे हाल
मैदानातील एका कोपर्‍यात फिरत्या स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. दुसर्‍या कोपर्‍यात पाण्याचा टँकर उभा करण्यात आलेला आहे. दुपारी कडक ऊन असल्याने सावलीसाठी झाडाझुडपांच्या, पोलिस व्हॅन आणि रुग्णवाहिकेच्या सावलीत संपकरी बसलेले असतात, अशी माहिती एसटी संपकर्‍यांनी दिली.

Exit mobile version