हवामान बदलाने उत्पादनात 50 टक्के घट
| खारेपाट | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील प्रगतशील शेतकरी सतीश म्हात्रे व रंजन म्हात्रे व म्हात्रेबंधू गेली अनेक वर्षे पांढर्या कांद्याचे उत्पादन घेत आहेत. त्यांच्या शेतातील कांद्याला रायगड जिल्ह्यास संपूर्ण राज्यभरात मोठी मागणी असून, विक्रीसाठी दाखल झाला आहे.
सन 2021 च्या तुलनेने 2022 या वर्षात अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण, उष्ण, दमट, थंड अशा वातावरणामुळे पांढर्या कांद्याच्या लागवडीमध्ये करपा रोग तसेच किडीचा रोग अशा विविध समस्येने यावर्षी शेतकर्यांच्या 50 टक्के उत्पादनात घट झाली आहे.
विशेष म्हणजे, सतीश म्हात्रे यांनी निसर्गाच्या अनेक समस्यांवर मात करुन कठोर परिश्रम व सातत्याने मेहनत घेऊन शासनाच्या कृषी अधीक्षक रायगड जिल्हा व सर्व कृषी अधिकारी तसेच सृष्टीग्रोचे प्रधान सर तसेच रोहा येथील शास्त्रज्ञ जितेंद्र कदम व त्यांच्या सहकार्यांचे मार्गदर्शन लाभल्याने सुमारे 50 खंडी पांढर्या कांद्याचे उत्पादन यशस्वी झाले आहे.
पाच लाखांचा नफा अपेक्षित
पांढर्या कांद्याचे लागवड, बेणणी, काढणी, माळा बांधणे तसेच खते, औषधे, मजूरवर्ग, देखभाल व मार्केटिंग याकरिता सुमारे तीन एकर शेतजमिनीत पांढरा कांदा उत्पादन घेण्यासाठी सुमारे चार लाख रुपये खर्च आला आहे. तरीही चार ते पाच लाख रुपये निव्वळ नफा मिळणे अपेक्षित आहे.
महिलांना रोजगार
पांढर्या कांद्याची लागवड नोव्हेंबर ते मार्चपर्यंत केली जाते. त्यामुळे अनेक महिला वर्गाला रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. तसेच पांढर्या कांद्याची वाढती मागणी लक्षात घेता यावर्षी मुंबई, नवी मुंबई, रायगड जिल्हा, पुणे, कल्याण, डोंबिवली आदी परिसरात पांढर्या कांद्याला जोरदार मागणी असून, मालाचा पुरवठा केला जात आहे.
शेतकरी हतबल
मात्र, बदलते हवामान, अवकाळी पाऊस यामुळे अलिबाग तालुक्यातील पांढर्या कांद्याचा उत्पादन घेणारा शेतकरी हतबल झाला आहे. तसेच शेतकरीवर्गाला दिलासा देण्यासाठी व त्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी सहानुभूतीपूर्वक विचार करणे गरजेचे आहे.