अलिबाग तालुक्यातील शेतकरी संकटात
| खारेपाट | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील शेतकर्यांचे पांढरे सोने म्हणून नावारुपाला आलेले पांढर्या कांद्याचे पीक सध्या अवकाळीच्या फेर्यात अडकल्े असून, शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील कार्ले, सोगाव, खंडाळा, वाडगाव व अन्य परिसरात अवेळी पावसाचा पांढर्या कांद्याच्या लागवडीला मोठा फटका बसला असून, शेतकरी संकटात आहे. त्याअनुषंगाने कृषी शास्त्रज्ञ रोहा जितेंद्र कदम यांनी कार्ले परिसरात घटनास्थानी येऊन पाहणी करुन शेतकर्यांना उपाययोजनांची घटनास्थळी माहिती दिली. याप्रसंगी अलिबाग तालुका कृषी पर्यवेक्षक मोहन सूर्यवंशी, कृषी सहाय्यक महेश पाटील, अशोक मिसाळ आदी कृषी अधिकारी व परेश मोकल कृषी सेवा केंद्र खंडाळा आदी उपस्थित होते. तसेच कार्ले परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
यावेळी कार्ले परिसरात घटनास्थळी शेतकर्यांना मार्गदर्शन करताना कृषी विभाग रोहा येथील शास्त्रज्ञ जितेंद्र कदम म्हणाले की, लागवड केलेली कांदा रोपे व कांद्याची रोपवाटिकेच्या वाफ्यातील पाणी चराद्वारे काढून पाण्याचा निचरा करणे, नवीन कांद्याची लागवड ही गादीवाफा किंवा सरीवरब्यांवर करावी, लागवड करतेवेळी सेंद्रीय खत/शेणखत/गांडूळखत यापैकी एक प्रतिचौरस मीटरला 1 किलो + ट्रायकोडर्मा पावडर 10 ग्रॅम किंवा निंबोळी पावडर प्रतिचौरस मीटरला 50 ग्रॅम याप्रमाणे मातीत मिसळून गादीवाफे किंवा सरीवरंबा तयार करावे. रोपांची पुनर्लागवड करतेवेळी रोपांची मुळे ट्रायकोडर्मा पावडर 25 ग्रॅम प्रतिलीटर पाणी किंवा कार्बनडेंन्झिम 2 ग्रॅम + इमिडाक्लोरोपीड 1 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 5 मिली प्रतिलीटर पाणी याप्रमाणे द्रावण तयार करुन रोपांची मुळे 10 ते 15 मिनिटे रोपे बुडवून नंतर लागवड करावी. लागवड केलेल्या काद्यांच्या रोपांची मर होत असेल तर सिलीकॉन+स्टीकर किंवा सूक्ष्म अन्न घटक म्हणूनची लेटेडझिंक 2 ग्रॅम/2 मिली प्रतिलीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कांदारोपाची मर होत असेल तर मेटोलेक्सिल 8%+मेन्कोजेब 64% किंवा हेक्झाकोनाझोल 3 ग्रॅम प्रतिलीटर पाण्यात मिसळून ड्रींचींग करणे अशा विविध उपाययोजनासंदर्भात बदलते हवामान व वेळोवेळी अवकाळी पडणारा पाऊस यापासून कांदापिकाचे करावयाचे व्यवस्थापन यासंदर्भात शास्त्रज्ञ जितेंद्र कदम यांनी माहिती दिली. विशेष म्हणजे, पांढर्या कांद्याला शासनाकडून नामांकन प्राप्त झालेले आहे. त्या दृष्टीकोनातून या परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी उत्पादनावर भर देत आहे. मात्र, अवेळी पाऊस, ढगाळ वातावरण व निसर्गाचा लहरीपणाने शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाकडून लक्ष देणे गरजेचे आहे, असे शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहे.
उत्पादनात होणार घट
गेल्या 50 वर्षात अशा अवेळी पाऊस पाहिला नाही, तसेच यापुढे परिस्थिती अशीच राहिल्यास पांढर्या कांद्याचे उत्पादन घेणे अशक्यच होईल. यंदा पांढर्या कांद्याचे उत्पादनात मोठी घट होण्याची दाट शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे, पांढर्या कांद्याला मोठी मागणी होत आहे. मात्र, उत्पादन कमी होत असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. तसेच शेतकर्यांना खताचा पुरवठाबाबत कमतरता जाणवत असून, आरसीएफचा सुफला व अन्य खतांचा पुरवठा सुरळीत करावा, असे मत सतीश म्हात्रे यांनी व्यक्त केले.
- सुमारे अडीच एकर शेतजमिनीत पांढर्या काद्यांची लागवड केली असून, अवेळी पडलेल्या पावसामुळे लागवडीला मोठा फटका बसला आहे. लागवड, खते, बी-बियाणे, मजूरवर्ग, औषधे याकरिता सुमारे दोन लाखांहून अधिक खर्च झाला आहे. – सतीश म्हात्रे, कांदा उत्पादक शेतकरी, कार्ले