राज्यात दहावी, बारावीचे वर्ग पुन्हा सुरू होणार?

। मुंबई । वृत्तसंस्था ।
राज्यातील कोरोनामुक्त झालेल्या किंवा भविष्यातही कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील,अशा गावांतील इयत्ता दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याची शक्यता पडताळून पाहा आणि शक्य असेल तेथे वर्ग सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी हिरवा कंदील दाखविला.

बारावीचे मूल्यांकन तसेच दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची बैठक झाली. शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षां गायकवाड यांच्यासह शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गेल्या काही महिन्यांपासून हिरवेबाजारसह कोरोनामुक्त असलेल्या गावांमध्ये दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. शिक्षण विभागाने ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणल्यानंतर जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्त आहेत आणि भविष्यातही गावे कोरोनामुक्त ठेवण्यासाठीच्या उपाययोजनांचे कडक पालन करत गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री ग्रामस्थ देतील अशा गावांमधील दहावी तसेच बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबत विचार करायला हरकत नाही. मुख्य विषयांपुरते वर्ग सुरू करण्याची शक्यता पडताळून पाहा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत अशा विद्यार्थ्यांचा पहिली ते बारावीपर्यंतचा शैक्षणिक खर्च शासनामार्फत उचलण्याबाबतची योजना शालेय शिक्षण विभागामार्फत प्रस्तावित करण्यात येत आहे, अशी माहिती प्रा. वर्षां गायकवाड यांनी या वेळी दिली. यावर यासाठी लागणार्‍या निधीसह प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर करावा, अशा सूचना ठाकरे यांनी दिल्या.

Exit mobile version