आठवी ते बारावीचे वर्ग होणार सुरु
राज्य सरकारकडून निर्णय जारी
मुंबई | प्रतिनिधी |
राज्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेचा आलेख ओसरत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागानं राज्यातील कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आता कोरोनामुक्त गावांमध्ये आठवी ते बारावीच्या शाळा ऑफलाईन भरविण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी शिक्षकांना गावातच राहावे लागणार आहे.
दरम्यान, शाळा सुरु करण्याबाबत राज्य सरकारने एक शासन निर्णय जारी केला आहे. ग्रामीण भागात कोरोनामुक्त गावातील ग्रामपंचायतीनं त्यांच्या अखत्यारीत असणार्या गावातील इयत्ता आठवी ते इयत्ता बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबत पालकांशी चर्चा करुन ठराव करावा, असं यात नमूद करण्यात आलं आहे. तसेच कोरोनासंबंधी सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी. शासनाने जारी केलेल्या कार्यपद्धतीचं काटेकोरपणानं पालन करावं, असं शासन निर्णयात सांगण्यात आलं आहे.
मार्गदर्शक सूचना
- शाळेत विद्यार्थ्यांना टप्याटप्याने बोलवण्यात येणार
- कोविड संबंधी नियमांचे पालन करावे लागणार
- एक बाकावर एक विद्यार्थी बसवता येणार दोन बाकांमध्ये सहा फूट अंतर
- एका वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी
- सतत हात साबणाने धुणे,मास्क घालणे हे नियम पाळवे लागणार
- कोणतीही लक्षण आढळल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवणार
- लगेच कोरोना चाचणी करावी लागणार
- संबंधित शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था त्याच गावात करावी किंवा त्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था न वापरण्याची दक्षता घ्यावी
- स्थानिक प्रशासनाने अशा शाळेचे हस्तांतरण शाळा व्यवस्थापनाकडे करण्यापूर्वी त्याचे पूर्णत: निर्जंतुकीकरण करावे.