शरद पवारांचे सुतोवाच
। ठाणे । प्रतिनिधी ।
माणसं फोडणं, साधनांचा वापर करणं आणि ईडीसारख्या यंत्रणांचा वापर करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं गंभीर चित्र या देशासमोर आज दिसत आहे. त्यामुळे देशातील बिगरभाजप पक्षांच्या नेत्यांशी सुसंवाद साधून लोकशाही मार्गाने आलेलं सरकार पाडण्याचं जे कृत्य सुरू आहे, त्याविरोधात जनमत तयार करण्यासाठी लढा उभा करण्याचा विचार करत आहोत, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी सोमवारी (दि.29) ठाणे येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले.
केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र, तेलंगणमध्ये नॉन भाजप सरकार आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेशात नॉन भाजपा सरकार होतं. ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगालमध्ये नॉन भाजपा सरकार आहे. या मार्गाने सत्ता येत असेल तर माणसं फोडणं, ईडीचा वापर करणं त्या माध्यमातून सरकार मिळवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे भाजपा व्यतिरिक्त पक्षांशी सुसंवाद साधून देशातील इतर राज्यातील पक्षांना एकत्र आणण्यासाठी काम करु, असंही पवार म्हणाले.
बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींना तुरुंगातून सोडण्यात आले. एवढंच नव्हे तर त्यांचा तुरुंगातून सुटल्यानंतर जाहीर सत्कार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात स्त्री वर्गाचा सन्मान करण्याची भूमिका मांडली होती. मात्र, त्यानंतर गुजरातमध्ये मोदींच्याच विचाराच्या सरकारने लाजीरवाणे आणि घृणास्पद कृत्य करणार्या आरोपींना तुरुंगातून सोडण्याचा निर्णय घेतला. हे अत्यंत चिंताजनक चित्र आहे, अशा शब्दात पवार यांनी गुजरातमधील सत्ताधार्यांवर हल्लाबोल केला. फक्त बोलणं महत्त्वाचं नसून कृती महत्त्वाची असते, अशा शब्दात पंतप्रधान मोदींना टोलाही त्यांनी लगावला.
अच्छे दिनवरुन टीका
मोदींनी देशात अच्छे दिनची घोषणा केली होती, पण ती पूर्णपणे फसली असल्याची टीकाही पवारांनी केली. निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनांपैकी एकाही आश्वासनांची या सरकारने 100 टक्के पूर्तता केली नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.