भारत टी-20 वर्ल्डकप संघात बदल करणार का?

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
युएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएलच्या 14व्या हंगामातील दुसरे सत्र संपताच सर्व खेळाडू आयसीसी टी-20 वर्ल्डकपच्या तयारीला लागतील. आयसीसीच्या नियमानुसार सर्व संघांनी त्यांचे मुख्य संघ जाहीर केले आहेत. आता जाहीर केलेल्या संघात बदल करण्याची मुदत 10 ऑक्टोबरपर्यंत देण्यात आली आहे. भारतीय संघाने देखील वर्ल्डकप संघाची घोषणा केली आहे. सध्या युएईमध्ये आयपीएलचा हंगाम सुरू आहे. तेथेच टी-20 वर्ल्डकप देखील होणार आहे. ज्या खेळाडूंची भारताच्या वर्ल्डकप संघात निवड झाली आहे त्याच्या आयपीएलमधील कामगिरीवर सर्वांचे लक्ष आहे. निवड झालेल्यापैकी विराट कोहली वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला खास कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे यासंदर्भात सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. भारतीय निवड समिती आयपीएलमधील कामगीरीवरून संघात काही बदल करतील का किंवा असे बदल करण्याचे धाडस दाखवतील का असा प्रश्‍न सर्वजण करत आहेत. आयपीएलच्या पहिल्या सत्रात दमदार कामगिरी करणार्‍या मुंबई इंडियन्सचा सूर्यकुमार यादव, ईशान किशन आणि कर्णधार रोहित शर्मा यांना अद्याप लैकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. या तिघांपैकी रोहितने गेल्या दोन सामन्यात चांगली सुरूवात करून दिली आहे. पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. सूर्यकुमार आणि ईशानची फलंदाजी काळजीचा विषय ठरला आहे. याच बरोबर संघातील ऑलराउंडर हार्दिक पंड्या हा देखील नुकताच फिट झाला आहे. गेल्या काही काळात त्याने चमकदार कामगिरी केली नाही. त्याचा फिटनेस हा देखील चर्चेचा विषय झालाय.

Exit mobile version