। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
राजापूर तालुक्यातील पेंडखळे भवानी मंदिर येथे विजेच्या खांबावर काम करत असताना विजेच्या तीव्र धक्क्याने तरुण वायरमनचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी (दि.6) सायंकाळी घडली असून अनिकेत परवडी (वय 27, रा. तिथवली, ता.राजापूर) असे मृत वायरमनचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पेंडखळे येथील भवानी मंदिर परिसरात वीज वाहिनीमध्ये बिघाड झाला होता. ही दुरुस्ती करण्यासाठी अनिकेत खांबावर चढला होता. खांबावर चढण्यापूर्वी ऑपरेटरकडून संबंधित वीज वाहिनीचा प्रवाह बंद करण्यात आला होता, असे सांगण्यात येत आहे. मात्र, दुरुस्तीचे काम सुरू असतानाच त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. हा धक्का इतका तीव्र होता की, तो खांबावरून थेट खाली कोसळला. अपघातानंतर त्याला तातडीने उपचारासाठी राजापूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अनिकेतच्या निधनाने तिथवलीसह राजापूर शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, वीज प्रवाह परत कसा सुरु झाला, याबाबत चौकशी सुरु आहे.






