| रायगड | खास प्रतिनिधी |
प्रतिस्पर्धी उमेदवार सुनील तटकरे हे भाजपाच्या मांडीवर जाऊन बसल्याने माझा दिल्लीचा मार्ग मोकळा झाला आहे. 2024 ची निवडणूक देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारी असल्याने घटक पक्षांनी संघटीत होऊन लढल्यास संविधान वाचवण्याची लढाई आपण जिंकू, असे प्रतिपादन इंडिया आघाडीचे रायगड लोकसभेचे उमेदवार अनंत गीते यांनी केले. अलिबाग काँग्रेस भुवन येथील मेळाव्यात ते बोलत होते. देशात भाजापाने राहुल गांधी यांचा अपार छळ केला असतानाही ते संविधान वाचवण्याची लढाई लढत आहेत. राहुल गांधी यांच्याकडे प्रचंड संयम आहे. त्यांच्या संयमाला मी सलाम करतो. प्रत्येकाने त्यांच्यासारखे कणखर राहिले पाहिजे. देश हितासाठी आपला असाच संघर्ष असला पाहिजे, असे गीते यांनी स्पष्ट केले.
2019 ची निवडणूक मी दीड लाख मतांनी हरलो असतो, तर मी समजलो असतो की, मला जनतेने नाकारले आहे. मात्र, साडेचार लाखांहून अधिक मते मला मिळाली. याचाच अर्थ मला रायगडच्या जनतेने स्वीकारले आहे. माझा पराभव हा निसटता होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले. तुम्ही पक्ष नेतृत्वावर श्रध्दा आणि निष्ठा ठेवा, ती कधीच वाया जाणार नाही. राज्यात सत्ता बदल झाल्याच्या दिवशी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला रात्री फोन केला आणि म्हणाले, तुम्ही ‘जो जिता वही सिकंदर’ हि म्हण ऐकली असेलच. पण मी त्यात जरा सुधारणा केली आहे. ‘जो रुका (त्याच पक्षात थांबला) वही सिकंदर’ असे ठाकरे मला म्हणाले आणि त्याच रात्री मला रायगड लोकसभेसाठी कामाला लागायचे आदेश दिल्याचे गीते म्हणाले.
चीन आणि रशियासारखे हुकूमशाही राजवट मोदींना भारत देशात आणायची आहे. यासाठी ते संविधान बदलण्याची तयारी करत आहेत मात्र, त्यांना याच निवडणुकीत रोखले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी काँग्रेसचे ॲड. प्रविण ठाकूर, जे.टी.पाटील, श्रध्दा ठाकूर, राजा ठाकूर, भास्कर चव्हाण, योगेशे मगर, पिंट्या ठाकूर, शिवसेनेचे सुरेंद्र म्हात्रे, कमलेश खरवले यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अलिबागच्या नावात अलिबागकरांची अस्मिता दडली आहे. अलिबागचे नाव बदलायचे की तेच ठेवायचे याचा निर्णय अलिबागकरच घेतील. बाहेरुन येऊन कोणी असे करण्याचा प्रयत्न करत असेल, तर अलिबागकर जनता तो डाव हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. अनंत गीते या लढाईत अलिबागकरांच्यासोबत असेल, असेही ते म्हणाले. निवडणुकीच्या तोंडावर हि दुर्देवी खेळी खेळली जात आहे. नवीन वाद, प्रश्न निर्माण करुन जनतेच्या मुळ प्रश्नांना बगल देण्याचे काम भाजपाचे राहुल नार्वेकर करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.