बीडीओ विना विकासकामांना खीळ

उरण पं.स.चा कारभार प्रभारींच्या हाती

| उरण | वार्ताहर |

उरण पंचायत समिती गटविकास अधिकारी सेवानिवृत्त झाल्या आहेत. अधिकारी नसल्यामुळे पंचायत समितीमध्ये कामकाज सुरळीत होत नाही. परिणामी, ग्रामीण भागातील विकासांच्या कामांना खीळ बसत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

प्रभारी पदभार असणार्‍या अधिकार्‍यांना त्याच्या विभागातील कामाचा ताण असल्यामुळे त्यांना उरण पंचायत समितीमध्ये पूर्णवेळ लक्ष देता येत नाही. त्यामुळे ग्रामीण विकासाला मोठ्या प्रमाणात खीळ बसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामीण विकासाची व्यवस्था ही पंचायत समितीवर अवलंबून आहे. त्यामुळे कायमस्वरुपी गटविकास अधिकारी देण्याची मागणी अनेक वेळा ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. कायमस्वरूपी बिडीओ नसल्याने उरण पंचायत समितीच्या कारभाराला दुपारी 12 वाजता सुरुवात होऊन सायंकाळी 4 वाजता संपत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तत्कालीन बीडीओ नीलम गाडे या 31 मे 2022 रोजी सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यानंतर प्रभारी चार्ज म्हणून संजय भोये हे आजतागायत काम पाहात होते. परंतु, आज संजय भोये यांच्या जागी खालापूर पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी सी.एस. राजपूत यांच्याकडे प्रभारी पदाचा चार्ज देण्यात आला आहे. राजपूत यांनी पदभार स्वीकारला आहे.

उरण पंचायत समितीचा कारभार प्रभारी बीडीओच्या हाती असल्याने विकासास कामांना खीळ बसली आहे. तसेच अनेकांनी लेखी व तोंडी तक्रारी करूनही त्या सोडविलया गेल्या नाहीत. यामध्ये प्रामुख्याने मुद्रांक घोटाळा, कामे न करता निधी हडप करणे, ग्रामपंचायत दप्तर गायब, सरपंच व सदस्यांच्या नावे लाखोंचे चेक, बोगस असेसमेंट उतारे, नियमांचे उल्लंघन करून इमारती उभ्या करणे यासंबंधी लेखी व तोंडी तक्रारी तसेच वृत्तपत्रात वृत्त प्रसिद्ध होऊनही प्रभारी बीडीओ भोये हे मार्गी लावण्यात अपयशी ठरल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रभारी बीडीओचा पदभार स्वीकारलेले राजपूत हे मार्गी लावून उरणच्या विकासाला चालना देतील का? की भोये यांच्यासारखी विकासांना खीळ बसते हे येणारा काळच ठरवेल.

Exit mobile version