। पाताळगंगा । प्रतिनिधी ।
खालापूर तालुक्यातील कुंभिवली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील पिण्याच्या पाण्यासाठी जलस्वराज्य पाणी योजना व वापरण्यासाठी नदीचे पाणी असे या ग्रामपंचायतीचे नियोजन आहे. पंचायत हद्दीत खरसुंडी, कुंभिवली व धामणी यासह आदिवासी व ठाकूर वाड्या असा भाग आहे. या ठिकाणी नागरी वस्ती असल्याने मुबलक पाणी मिळावे, अशी येथील महिलांची मुख्य मागणी आहे. मात्र, या ठिकाणी पाण्याचा पुरवठा एक दिवसाआड होत आहे. मागील काही दिवसांपासून धामणी गावात ग्रामपंचायतीच्या नियोजना अभावी पाणी न आल्याने येथील महिलांनी थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठले. यावेळी महिलांनी पंचायतीला जाब विचारीत आम्हाला दिवसाआड पाणी द्या, अशी मागणी केली आहे.
यावेळी महिलांनी ग्रामपंचायतीला जाब विचारला. त्या म्हणाल्या की, आम्ही वेळवर घरपट्टी भरत असून देखील वेळेवर मुबलक पाणी का मिळत नाही? आम्हाला पिण्याचे आणि वापरण्यासाठीचे पाणी दिवसाआड मिळाले तरी चालेल, परंतु पाण्याच्या वेळेचे नियोजन करा, अशी मागणी महिलांनी केली आहे. यावेळी ग्रामसेवक विश्वास वारे यांनी कर्मचारी वर्गाला पाणी सोडण्याचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या. याबाबत महिलांच्या म्हणण्यानुसार त्यांना लेखी पत्र देण्यात आले. यावेळी धामणी गावासाठी कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर महिलावर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
यावेळी सरपंच रेखा वीर, ग्रामसेवक विश्वास वारे, सदस्य परेश गायकवाड, नीलम लोते, शुभांगी वाघमारे, नरेश मनेर, विशाल म्हामुणकर, ग्रामस्थ अॅड. कृष्णा पवार, घनश्याम भाऊ वीर तुकाराम लोते, काशिनाथ जगताप आदी. उपस्थित होते.