| अलिबाग | प्रतिनिधी |
उद्यम शिलतेतून सक्षम व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी भारतीय उद्योजकता विकास संस्था (ईडीआय) अहमदाबाद उदया प्रकल्प कार्यालय अलिबाग व टाटा कम्युनिकेशन्स मुंबई पुरस्कृत नावडे पनवेल को ऑफ इंडस्ट्रीज सभागृह पनवेल येथे (दि.11) रोजी आयोजित महिलांकरीता उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमात केले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पनवेल तहसीलदार मीनल भांबरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस. हरळया, रायगड जिल्हा बँक तळोजाचे व्यवस्थापक नितेश तोंडसे, उद्योजक विजय लोखंडे, उद्योजक लक्ष्मण जाधव सामाजिक कार्यकर्त्या व उद्योजिका राजश्री पाटील उपस्थित होते.
भारतीय उद्योजकता विकास संस्था (ईडीआय) व टाटा कम्युनिकेशन्सच्या सामाजिक दायित्व विभागाकडून पुरस्कृत उदया प्रकल्पांतर्गत दोन आठवडे कालावधीचे महिला व दिव्यांगांकरिता उद्योजकता विकास कार्यक्रम घेण्यात आला होता. कार्यक्रमात सर्व प्रथम ईडीआयचे प्रकल्प अधिकारी शशिकांत दनोरीकर यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रशिक्षणामध्ये सहभागी प्रशिक्षणार्थींना जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात येऊन नावडे येथील महिला प्रशिक्षणार्थीनी सुरु केलेल्या माऊली भाकरी सेंटरचे उद्घाटन जिल्हाधिकारी जावळे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाकरिता रायगड जिल्हा बँकेचे व जिल्हा उद्योग केंद्राचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन ईडीआय अलिबाग प्रकल्प अधिकारी शशिकांत दनोरीकर यांनी केले. या कार्यक्रमाला महिला प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.







