| पुणे | प्रतिनिधी |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसेच नगरसेवक व्हायचं असेल तर कामाला लागा. निधी वाटपाबाबतही त्यांनी सूचक वक्तव्य केलं होत. खासदार कोल्हे यांना विचारलं असता ते म्हणाले की, समोरच्या उमेदवाराचा पराभव दिसायला लागला की, अशा पद्धतीने दबाव तंत्र हे वापरलं जात आहे. पण सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतली आहे.
खा. अमोल कोल्हे म्हणाले, नगरसेवक होण्यापेक्षा देशातील महागाई कमी होणार का? शेतकर्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळणार का? बेरोजगार तरुणांना रोजगार मिळणार का? हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. आज गुजरातच्या शेतकर्यांना एक न्याय आणि महाराष्ट्राच्या शेतकर्यांना एक न्याय दिला जात आहे. महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी का केली जात आहे? असा खोचक प्रश्न यावेळी खा. कोल्हे यांनी अजित पवार यांना विचारला आहे. महाविकास आघाडीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. कोल्हे यांच्या प्रचारासाठी पुण्यातील हडपसर मतदारसंघात प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याबाबत अमोल कोल्हे यांना विचारलं असता ते म्हणाले, ”आज सर्वसामान्य जनता ही इंडिया आघाडीच्या मागे उभी आहे. आज देशाच्या पंतप्रधानांना इथे यावं लागत आहे. यातच इंडिया आघाडीचा विजय आहे, यावेळी कोल्हे यांनी म्हटलं आहे.
बारामती तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्याकडून दमदाटी केली जात असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. याबाबत कोल्हे यांना विचारलं असता ते म्हणाले की, वारंवार निधीबाबत सांगितलं जात आहे. निधी हा सर्वसामान्य नागरिकांच्या घरातील हा पैसा असतो. निधी हा कोणाच्याही मालकीचा नाही. अशा दमदाटीला सर्वसामान्य जनता या माध्यमातून उत्तर देणार आहे. निवडणूक हातातून निसटते तेव्हा अशा पद्धतीने दमदाटी केली जाते, असं यावेळी खासदार कोल्हे म्हणाले. अजित पवार यांना पत्नी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठीच बारामतीत अडकावं लागत आहे का? याबाबत कोल्हे यांना विचारलं असता ते म्हणाले, एखाद्या राष्ट्रीय अध्यक्षाला जर चार जागांवर समाधान मानावं लागत असेल तर ही परिस्थिती काय आहे? हे आपण समजावं. त्यातही एक स्वतःच्या प्रदेशाध्यक्षांना उमेदवारी द्यावी लागते. तर एक पत्नींना उमेदवारी द्यावी लागते. दोन उमेदवार हे बाहेरून आयात करावे लागत आहेत. आता यातच काय परिस्थिती आहे? हे आपल्याला माहीत आहे, असा टोला यावेळी कोल्हे यांनी अजित पवारांना लगावला आहे.