महावितरणचा भोंगळ कारभार
। कोर्लई । वार्ताहर ।
मुरुड शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेली अंडरग्राऊंड वीज वाहिनी टाकण्याची कामे अद्यापही अर्धवट अवस्थेत असल्याने महावितरणच्या भोंगळ कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजाला हुलकावणी देत राज्यात, कोकणात मान्सून दाखल झाला. दहा जूनच्या रात्री मुरुडमध्ये वीजांच्या कडकडाट पहिला पाऊस पडतो न पडतो तोच वीजपुरवठा खंडित झाला आणि महावितरणच्या भोंगळ कारभाराचा शहरातील नागरिकांना प्रत्यय आला. वीज पुरवठ्याअभावी तासन्तास त्रास सहन करावा लागला.
पाच वर्षांपूर्वी मुरुड शहरात अंडरग्राऊंड वीज वाहिन्यांची करण्यात येत असलेली कामे अद्यापही अर्धवट अवस्थेत असून काही ठिकाणी दुरवस्था पाहावयास मिळते आहे. मुरुड शहरात अनेक ठिकाणी नारळ सुपारीच्या बागा रस्त्यालगत आहेत. पावसाळ्यात उद्भवणार्या वीज समस्यांना तोंड देण्यासाठी जमिनीतून (अंडरग्राऊंड) वीज वाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले होते. सद्यस्थिती व कामाचा दर्जा पाहाता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शासनाने यासाठी अंदाजित कोट्यावधी रुपयांचा केलेला खर्च वाया तर गेला नाही ना असे असेल तर याला जबाबदार संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्याकडून नुकसानीची भरपाई घेण्यात यावी, असे बोलले जात आहे. अंडरग्राऊंड वीज वाहिनी टाकण्यात आली तर शहरातील वीज समस्या कायमची नष्ट होईल व मग मेंटेनन्स करायला मिळणार नाही? यामुळे तर हे काम रखडले नाही ना? असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.
जनतेने कर रुपातून भरलेल्या पैशातून निधीतून विविध विकास कामे पूर्ण केली जातात. मुरुड-जंजिर्याला पर्यटनाचा दर्जा प्राप्त झाला असून केंद्र सरकारच्या दिनदयाळ उपाध्याय योजनेतून शहरातील अंडरग्राऊंड वीज वाहिनी टाकण्यासाठी कोट्यावधीचा निधी मंजूर झाला. स्थानिक लोकप्रतिनिधी व न.प.चे तत्कालीन सत्ताधारी मुरुडच्या वीजप्रश्नी औचित्य दाखविले नाही. शहरातील अंडरग्राऊंड वीज वाहिन्यांची कामे अर्धवट अवस्थेत असल्याने याची संबंधित अधिकारी व ठेकेदार यांची सखोल चौकशी होऊन शासन उचीत कारवाई करण्यात कोणती भूमिका घेते. याकडे लक्ष लागून राहिले असून ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येऊन वीजपुरवठा सुरळीत व्हावा, अशी भावना जनमानसातून व्यक्त केली जात आहे.