रेल्वे, वनविभागासह भूसंपादनाचा तिढा कायम
। माणगाव । प्रतिनिधी ।
कोकणासह तळ कोकणच्या विकासाचा मार्ग म्हणून ओळखला जाणारा मुंबई-गोवा महामार्गाची दिवसेंदिवस अवस्था पाहवेना झाली असून या मार्गावरून दिवसेंदिवस महाराष्ट्रासह अन्य राज्यातूनही पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहेत. या मार्गाच्या कामाची गेली दहा वर्षापासून चांगलीच रखडपट्टी सुरु आहे. माणगाव व इंदापूर शहरात वाहतूक कोंडी सतत होत असल्याने प्रवासी नागरिकांची चांगलीच रखडपट्टी होत आहे.
तळ कोकणासह गोव्याकडे जाणार्या नागरिकांना माणगाव बाजारपेठेत अडथळा होऊ नये म्हणून माणगावच्या बाहेरून शहराला बायपास रस्ता काढला असून या बायपास मार्गाचे काम पाच वर्षापासून थांबले आहे. हा बायपास रस्ता वनखात्याच्या जमिनीतून व कोकण रेल्वेला उड्डाण पूल होत असल्याने इंदापूर आणि माणगाव येथील दोन्ही शहरालगतचे बायपासचे काम रखडले जात आहे. त्यातच वैयक्तिक जमीनीच्या काही मालकाना भूसंपादनाचा मोबदला मिळाला नसल्यामुळे बायपासचे काम रखडले आहे. केंद्रीय रस्ते, वाहतूक महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी 3 एप्रिल रोजी इंदापूर येथील कार्यक्रमात मुंबई-गोवा महामार्गाच्या रस्त्याचे काम एक वर्षात पूर्ण करू अशी ग्वाही दिली होती. मात्र वन, रेल्वे खात्याची मंजुरी मिळाली नसल्याने हे काम रखडले आहे. त्यातच या मार्गातील कांही शेतकर्यांना भूसंपादनाचा मोबदला मिळाला नसल्याने बायपासच्या कामाचे भिजत घोंगडे पडले आहे.
माणगावात वाहतुकीचा ताण पडत असून वारंवार वाहतूक कोंडीशी सामना पर्यटक नागरिकांना करावा लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे कामाचे गेली अनेक दिवस घोंगडे भिजत पडले आहे. त्यामुळे प्रवाशी, पर्यटक, नागरिकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरण कामाला गती कधी मिळणार असा संतप्त सवाल नागरिकातून होत आहे. दुसर्या टप्प्याच्या रस्ता चौपदरीकरणाचे काम इंदापूर ते कशेडी घाट असे सरकारने हाती घेतले आहे. त्याही कामाला फारशी गती मिळाली नाही. एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था महामार्गाची झाली असून झाली असून इंदापूर ते कशेडी घाट हा दुसरा टप्पा 77 किलोमीटर अंतराचा असून पहिला टप्पा पळस्पे ते इंदापूर हा 87 किमीचा आहे. या पहिल्या टप्प्याच्या कामाकडे सरकारने गांभीर्याने पाहिलेले नाही. कोकणच्या विकासाला अडथळा निर्माण करणार्या महामार्गाचे रुंदीकरण हे महत्वाचे आहे.