विविध मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
| अलिबाग | प्रतिनिधी |
क्षयरोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी क्षयरोग विभागातील कर्मचाऱ्यांनी समान काम समान वेतन, शासकिय सेवेत सामावून घ्यावे अशा प्रमुख मागण्यांसाठी सोमवारपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे.
क्षयरोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने 1998 पासून राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती केली. डाटा ऑपरेटरपासून टेक्निशियन, वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक, वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक, समन्वयक, सुपरवायझर अशी अनेक पदे भरण्यात आली. कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन क्षयरोग शोधण्याचे काम केले. तपासणी करण्यापासून रुग्णांवर उपचार करणे, वेळेवर औषधे देणे अशा अनेक प्रकारची कामे त्यांच्यांमार्फत करण्यात आली. त्यामुळे रायगड जिल्हा हा क्षयरोग मुक्तीच्या वाटेवर असल्याचे चित्र आहे.
या कर्मचाऱ्यांना फक्त 10 ते 20 हजार रुपयांचे मानधन देऊन त्यांना राबविले जात असल्याचा आरोप केले जात आहेत. त्यांना शासकिय सेवेत कायम केले जात नसून समान काम समान वेतन देण्यास टाळाटाळ केली जात आहे. याबाबत रायगड जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी 20 नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. दुपारी क्षयरोग अधिकारी कार्यालयासमोर त्यांनी निदर्शने केली. सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन पुकारले जाईल असा इशारा देण्यात आला. यावेळी महेश भोसले, रविंद्र माने, निलेश धुतसकर, जितेंद्र अहिरराव, रतिश पाटील, योगेश म्हात्रे, शुभांगी पाटील, नेत्रा पिंगळे, आदिती पाटील, ऋषाली पाटील आदी कर्मचारी उपस्थित होते.
क्षयरोग मुक्तीवर परिणाम होण्याची भीती संशयित क्षयरुग्ण शोधणे, क्षयरोगाचे निदान करणे, रुग्णांना वेळेवर उपचार करण्याबाबत माहिती घेणे, त्याची माहिती संगणकावर ठेवणे. खासगी वैद्यकीय संस्थासमवेत शासनाचा समन्वय साधून रुग्णांना वेळेवर उपचार करण्यासाठी मदत करणे. अशा अनेक प्रकारची कामे ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.