सचिन घाडी यांची कारवाईची मागणी
| सोगाव | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील सर्वात जास्त विस्तीर्ण असलेल्या वनविभागाच्या रामधरणेश्वर डोंगरावर गुरुवार दि.14 रोजी संध्याकाळी अज्ञात समाजकंटकांनी आग लावली. या आगीत औषधी वनस्पती व इतर वनसंपदेचे तसेच गुरांच्या चाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा आग लावणाऱ्या समाजकंटकांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी पर्यावरण मित्र सचिन घाडी यांनी वनविभागाला केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रामधरणेश्वर येथे वणवा लागल्याची माहिती पर्यावरण मित्र सोगावकर यांना मिळाली असता त्यांनी वनविभागाचे वनकर्मचारी दत्ता कोळेकर यांच्या सोबत संपर्क साधून माहिती दिली. वनकर्मचाऱ्यांनी त्वरित प्रतिसाद देत डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या सोगाव येथे आले. याचदरम्यान वणवा विझवण्यासाठी मुनवली येथील पर्यावरण मित्र सचिन घाडी यांनाही वणवा लागल्याची माहिती दिली. त्यांनी आग विझविण्यासाठी लागणारी मशीनने आग विजविण्यात आली.
अशा वणव्याने मोठ्या प्रमाणात वनसंपत्तीचे नुकसान होऊन पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. वणवा जरी डोंगरावर लागत असला तरी गुरे असणाऱ्या शेतकऱ्यांना व त्यांच्या मालकांना चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊन आर्थिक नुकसान होत आहे. तरी वनविभागाने यापुढे अशा प्रकारे वणवे लावणाऱ्या कारवाई करावी, तसेच वनपरिक्षेत्र असलेल्या ठिकाणी वारंवार गस्त वाढवण्यात यावी, अशी मागणी पर्यावरण मित्र सचिन घाडी यांनी केली आहे.