| सातारा | प्रतिनिधी |
52वी हिंद केसरी कुस्ती स्पर्धा सातारा येथे आयोजित करण्यात आली आहे. भारतीय शैली कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघाच्या मान्यतेने राजेश्वर प्रतिष्ठान व तालीम संघाच्यावतीने हिंद केसरी कुस्ती स्पर्धा होत आहे. शुक्रवारी (दि.15) या स्पर्धेचे उद्घाटन झाले.
ही स्पर्धा 1958 मध्ये हैदराबादमध्ये सुरू झाली. त्यावेळी मध्य प्रदेशातील रामचंद्र बाबू यांनी पहिला हिंद केसरी होण्याचा मान मिळवला होता. महाराष्ट्राला पहिला हिंद केसरी मिळवून देण्याचा मान 1959 मध्ये श्रीपती खंचनाळे यांनी मिळवला होता. त्यानंतर ही परंपरा गणपत आंधळकर, मारुती माने, हजरत पटेल, दीनानाथ सिंग व चंबा मुतनाळ यांच्यामुळे ती पुढे सुरू होती. त्यानंतर महाराष्ट्राला हा किताब मिळवण्यासाठी तब्बल 28 वर्षे वाट पाहावी लागली. 2003 मध्ये विनोद चौगुले यांनी ही कोंडी फोडली. पाठोपाठ योगेश दोडके (2005), पुण्याच्या अभिजित कटके (2023) यांनी हा मान मिळवून महाराष्ट्राची मान उंचावली आहे. महाराष्ट्रात कोल्हापूर, पुणे, सोलापूर जिल्ह्याचे वर्चस्व राहिले आहे. याच जिल्ह्यातील मल्लांनी महाराष्ट्राला हा मान मिळवून दिला आहे. अलीकडच्या काळात हरियानाच्या मल्लांच्या वर्चस्वाला छेद देत महाराष्ट्राचे पैलवान पुन्हा एकदा हिंद केसरीच्या गदेवर नाव कोरण्यास सज्ज झाले आहेत. ट्रीपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, शिवराज राक्षे, हर्षवर्धन सदगीर, वेताळ शेळके, पृथ्वीराज मोहोळ, महेंद्र गायकवाड, शुभम शिदनाळे, जयदीप पाटील हे मल्ल उतरले आहेत. सर्वांचे लक्ष लागले आहे ते विजय चौधरी यांच्या कामगिरीवर आहे. या मल्लांकडून महाराष्ट्रातील कुस्तीप्रेमींना मोठ्या आशा आहेत.






