युवा प्रशिक्षणार्थी आक्रमकतेच्या भूमिकेत

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

महायुती सरकारने मते मिळविण्यासाठी मागील विधानसभा निवडणूकीत घोषणांचा पाऊस पाडला होता. मात्र, जिल्ह्यासह महाराष्ट्रात प्रशिक्षणार्थींवर आता बेकारीचे संकट उभे राहीले आहे. मुंबईच्या आंदोलनानंतर युवा प्रशिक्षणार्थी आक्रमतेच्या भूमिकेत आहेत. आगामी काळात जिल्ह्यात थोर महापुरुषांच्या स्मारका समोर सरकारचा निषेध करण्यात येणार असल्याची माहिती आंदोलकांनी दिली.

भर पावसात युवा प्रशिक्षणार्थी संघटनेच्यावतीने मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करत सरकारला धारेवर धरले. थोर महावीर क्रांतिकारक यांचा मोठ्याने जय घोष करत सरकारला त्याचा चेहरा आरश्यात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. “ही पावसात पडलेली ठिणगी आहे आणि येणाऱ्या पुढील काळात वणवा पेटणार… मायबाप सरकारने तातडीने प्रशिक्षित बेरोजगार प्रशिक्षणार्थींना शासकीय कंत्राटी पद्धतीने रोजगार आणि 10 टक्के आरक्षण शासकीय भरतीत द्यावे”, अशी मागणी प्रांताध्यक्ष निलेश वसावे, राज्य सचिव ऋषिकेश पवार, कार्याध्यक्ष पवन भड, राज्य सदस्य सबेरा तडवी, जळगाव महिलाध्यक्ष हर्षली साळुंखे, वर्धा प्रतिनिधी स्वप्नील तांबेकर व सर्व 36 जिल्हा प्रतिनिधी यांच्याकडून करण्यात आली. त्यामुळे सरकारने युवकांच्या धोरणात्मक निर्णयाकडे लक्ष द्यावे, अन्यथा राज्यातील सर्व जिल्ह्यात थोर महापुरुषांच्या स्मारका समोर सरकारचा निषेध करण्यात येईल, असा इशारा देखील त्यांच्याकडून देण्यात आला.

रायगड जिल्ह्यातील 1 हजार 600 युवांचा समावेश आहे. 18 ते 35 वयोगटातील युवा, युवतींची जिल्ह्यातील ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये डाटा ऑपरेटर म्हणून मानधनावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. ऑनलाईन काम करण्यापेक्षा ऑफलाईन काम देऊन या तरुणांना राबविण्याचे काम वेगवेगळ्या विभागातून करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रात बाह्य रुग्ण कक्षातील रुग्णांची तपासणी करणे, ग्रामपंचायतीमधील घरपट्टी, पाणीपट्टी तसेच इतर कामेदेखील करून घेण्यात आली. मागील चार वर्षांची प्रलंबित कामे युवांकडून करून घेतली. निवडणुकीपूर्वी ही योजना राबविली होती.आता मात्र या योजनेचा कारभार नव्याचे नऊ दिवस या उक्तीप्रमाणे सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे युवा वर्गात सरकारच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी आहे, असे आंदोलकांनी सांगितले .

युवा प्रशिक्षणार्थींवर बेकारीचे संकट निर्माण झाले आहे. सरकारने युवांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, यासाठी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले होते. हे आंदोलन नंतर सामान्य प्रशासन व कौशल्य विभागाचे सचिवान समवेत शिष्टमंडळाची बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीनंतर सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलनाची तीव्र भूमिका राहणार आहे.

ऋषिकेश पवार,
राज्य सचिव, युवा प्रशिक्षणार्थी संघटना
Exit mobile version