”आपले सरकार” प्रणाली उपयुक्त

जिल्हाधिकारी किशन जावळे यांची माहिती

| अलिबाग | वार्ताहर |

नागरिकांना त्यांच्या मोबाईल फोन किंवा संगणकाच्या माध्यमातून तक्रार दाखल करण्याची सुविधा प्रदान करण्यासाठी आपले सरकार तक्रार निवारण प्रणाली 2.0 ची निर्मिती करण्यात आली असून, नागरिकांच्या तक्रारींचे जलदगतीने, सोयीस्कर आणि प्रभावी निवारण करण्यास आपले सरकार तक्रार निवारण प्रणाली उपयुक्त असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आपले सरकार तक्रार निवारण 2.0 प्रणालीच्या वापराबाबत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथे आयोजित प्रशिक्षण शिबिरात दिली.

या सुविधेमुळे नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदविता येते. त्यामुळे तक्रार नोंदविण्यासाठी कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज भासत नाही. त्याचबरोबर, तक्रारीच्या सद्य:स्थितीचा पाठपुरावा करता येतो आणि निवारणामुळे समाधान झाले किंवा नाही याबाबतचा अभिप्रायही देण्याची सुविधा प्राप्त होते. ही यंत्रणा कार्यालयाला सर्व तक्रारींचा काळजीपूर्वक पाठपुरावा करून देते आणि प्रत्येक प्रकरणात योग्य कारवाई करण्यात आल्याची खातरजमा करते. प्रशासनाद्वारे नागरिकांच्या तक्रारींचे जलदगतीने, सोईस्कर आणि प्रभावी निवारण करणे, हे या पोर्टलचे उद्दिष्ट आहे व त्यास सर्व कार्यालयांनी प्राधान्य द्यावे अशा सूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यावेळी दिल्या.

हे प्रशिक्षण आपले सरकार ई-गव्हरनन्स तज्ज्ञ देवांग दवे, आपले सरकार सहाय्यक विनोद वर्मा, आपले सरकार तांत्रिक प्रतिनिधी शुभम पै यांच्यामार्फत घेण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक रायगड सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) डॉ.रविंद्र शेळके, तहसिलदार महसूल चंद्रसेन पवार, सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार तसेच इतर सर्व शासकीय विभागांचे प्रमुख आदींची उपस्थिती होती.

Exit mobile version