खंडीत वीज पुरवठ्यामुळे व्यावसायिक संकटात
| रायगड | प्रमोद जाधव |
पर्यटनाच्या दृष्टीने काशीद समुद्रकिनारा कायमच पर्यटकांच्या पसंतीला उतरला आहे. त्यामुळे लाखो पर्यटक या पर्यटन स्थळाला भेट देऊन सुट्टीचा आनंद लुटतात. मात्र, ऐन सुट्टीच्या हंगामातच काशीदच्या पर्यटनाला विजेचा झटका बसला आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने कॉटेज, हॉटेल व्यावसायिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. विजेअभावी त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. महावितरणच्या या मनमानी आणि गलथान कारभाराविरोधात व्यवसायिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग, नागाव, किहिम, रेवदंडा, श्रीवर्धन, दिवे आगर, मुरुड तसेच काशीद ही ठिकाणे पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जातात. समुद्रात पोहण्याबरोबरच समुद्र सफरीचा आनंद पर्यटक या पर्यटन स्थळांवरून लुटत असतात. नारळी पोफळीच्या बागा, सुंदर असा समुद्रकिनाऱ्याची पर्यटकांना कायमच आकर्षण आहे. शनिवार-रविवार या साप्ताहिक सुट्टी बरोबरच अन्य सुट्टीच्या हंगामात पर्यटक या पर्यटन स्थळी फिरायला येत असतातत. सध्या शाळा महाविद्यालयांना उन्हाळी सुट्टी जाहीर केली आहे. उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबई, पुणे व इतर जिल्ह्यांसह राज्यातील तसेच देश-विदेशातील पर्यटक रायगडमध्ये दाखल होऊ लागले आहेत. मुरुडमधील ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यासह काशीद या पर्यटनस्थळाला अधिक भेटी देण्यावर पर्यटकांनी भर दिला आहे. सध्या सुट्टीच्या हंगामात काशीद समुद्रकिनारी पर्यटकांची अलोट गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे येथील कॉटेज, हॉटेल आणि रेस्टॉरंट फुल्ल होऊ लागले आहेत. काशीद समुद्रकिनारा पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण आहे. पर्यटन वाढीमुळे स्थानिकांना रोजगाराचे साधने खुले झाले आहे. मात्र, महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे येथील व्यवसाय मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
महावितरण विभाग विभागाकडून वारंवार वीज पुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे एसी, फॅन आणि गरम पाण्याची सोय नसल्यामुळे पर्यटकांना त्याचा त्रास होत आहे. तासंतास वीजपुरवठा खंडित होत असल्याने साठवून ठेवलेले खाद्यपदार्थ देखील खराब होण्याची भीती व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे विजेअभावी त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.हॉटेल व्यावसायिकांना एका मोठ्या संकटाशी सामना करावा लागत आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने येथील व्यवसायिकांना जनरेटरचा आधार घ्यावा लागत आहे. डिझेलचा आवाढव्य खर्च लहान मोठ्या व्यावसायिकांना परवडत नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक फटका बसत आहे. पर्यटनाच्या हंगामातच वीजपुरवठा खंडित होत असल्याचा त्रास वाढल्याने व्यवसायिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. महावितरणने हा प्रकार थांबवला नाही, तर त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा व्यावसायिकांनी दिला आहे.
सरत्या हंगामात पोटाला चिमटा
काशिद समुद्रकिनारी दरवर्षी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पर्यटक येत असतात. मुरूडमधील ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी जाणारा पर्यटक याठिकाणी हमखास थांबतोच. या ठिकाणी पर्यटकांसाठी वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सध्या सुट्ट्यांचा हंगाम असल्यामुळे येथील पर्यटनाला बहर आला आहे. मात्र, पुर्णपणे पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या स्थानिक व्यावसायिकांच्या पोटाला महावितरणकडून चिमटे काढले जात आहे. मे महिना हा पर्यटन हंगामातील शेवटचा महिना असून पावसाळ्यातील पुढील 4 महिने काशीद समुद्रकिनारा पुर्णपणे बंद असतो. या सरत्या महिन्यात कमाई होईल त्यावर पुढील 4 महिने व्यावसायिकांचे पोट भरणार आहे. मात्र, महावितरणच्या मनमानी कारभारामुळे उपासमारिची वेळ येऊ शकते, अशी भीती स्थानिक व्यावसायिकांमधून होत आहे.
काशीद हे ठिकाण पर्यटनच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. दीडशेहून अधिक हॉटेल, कॉटेज या परिसरात आहे.
स्थानिक हॉटेल व्यावसायिक
येथील 80 टक्केहून अधिक नागरिक पर्यटनावर अवलंबून आहेत. सध्या उन्हाळी सुट्टीत पर्यटक काशीदमध्ये मोठ्या प्रमाणात येत आहेत. मात्र, महावितरणच्या नियोजन शून्य कारभारामुळे सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याचा प्रकार घडत आहे. महावितरण कंपनीने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करून पर्यटन व्यवसायाला गती देण्यासाठी सहकार्य करावे.






