। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड दुर्गवळीवाडी येथील तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 24) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. ओंकार अनिल दुर्गवळी (26) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मालगुंड दुर्गवळीवाडी येथील ओंकार हा गुरुवारी रात्रीच्या सुमारास घरातून बाहेर पडला होता. मात्र, बराच वेळ होऊनही तो घरी न परतल्याने त्याची शोधाशोध सुरू झाली. याचवेळी मालगुंड दुर्गवळीवाडी येथे सुनील साळवी यांच्या मालकीच्या असलेल्या विहिरीत काहीतरी पडल्याचा मोठा आवाज आला म्हणून तेथील ग्रामस्थांनी विहिरीकडे धाव घेत डोकावून पाहिले असता ओंकार विहिरीत पडल्याचे निदर्शनास आले. स्थानिकांनी याबाबतची माहिती त्याच्या कुटुंबियांना आणि वाडीतील इतर ग्रामस्थांना दिली. त्यानंतर विहिरीत पडलेला तरुण हा ओंकारच असल्याची खात्री करून या घटनेची माहिती गणपतीपुळे पोलीस चौकीच्या पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी हजर होऊन या घटनेचा पंचनामा केला.
तसेच, या घटनेचा अधिक तपास जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणपतीपुळे पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करीत आहेत.