। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात झालेला विकास हा शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून झालेला आहे. मागील निवडण्ाूकीत जनतेने विश्वासाने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी फिरकतही नसल्याने जनतेच्या विश्वासाचा घात झाल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत आपल्या आमदारकीच्या काळात शेकापच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांच्या उजळणीशिवाय काही न करता फक्त शेकापच्या कामांचे श्रेय लाटण्याचे काम विरोधक करत असल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी केला.
बेलोशी येथे माजी आमदार पंडित पाटील यांच्या उपस्थितीत बामणगाव, बेलोशी विभागातील शेकाप कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी शेकापचे अलिबाग तालुका चिटणीस अनिल पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष वागळे आदी उपस्थित होते.
पंडित पाटील पुढे म्हणाले की, संघटनात्मक कार्य करा, संघटनात्मक कार्याची दखल घेतली जाते. वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून पुन्हा जोमाने कामाला लागा. शेकापचा बालेकिल्ला शेकापचा विचार कधीच संपणार नाही. कोण आले गेले तरी फरक पडत नाही. विचार कधीच संपत नाही.