आ. जयंत पाटील यांच्या वाढदिवशी पारितोषिक वितरण
I मुंबई I प्रतिनिधी I
राज्यातील सर्वात जुना आणि आपल्या वैचारिक निष्ठेवर आजपर्यंत आपले अस्तित्व टिकवून असलेल्या शेतकरी कामगार पक्षाला पुन्हा राज्यभरात आपले गतवैभव मिळवून देण्यासाठी पक्षविस्तार कार्यात जनसहभाग मिळावा यासाठी पक्षाच्या पक्ष प्रशिक्षण, प्रचार व प्रसार समितीच्या वतीने राज्यव्यापी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल शनिवार, 26 जून रोजी जाहीर करण्यात आला असून, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या वाढदिवशी 7 जुलै रोजी पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती शेकापचे मध्यवर्ती समिती सदस्य तथा पक्ष प्रशिक्षण, प्रचार व प्रसार समिती सदस्य भाई चंद्रशेखर पाटील यांनी दिली.
शेतकरी कामगार पक्ष नेतृत्वाने नव्या वैचारीक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने पक्षाच्या राजकीय पिछेहाटीवर नव्या दमाने व उमेदीने चिंतन सुरू केले आहे. अभ्यासू, चिंतनशील व प्रामाणिक कार्यकर्त्यांची व नेत्यांची जीवघेणी कोंडी झाली आहे. ही कोंडी फोडण्याची नितांत गरज निर्माण झालेली आहे. त्याकरीता पक्ष प्रशिक्षण, प्रचार व प्रसार समितीच्या माध्यमातून ही महाराष्ट्रव्यापी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेतील दहा विजेते पुढीलप्रमाणे – डॉ. दीपक सर्जेराव शेटके-पाटील, वडकशिवाले, ता. करवीर, कोल्हापूर, प्रा. डॉ. सुनील पवार, पेण, जि. राजगड, वैभव उत्तम जाधव, हिंगोली, शांताराम वाघ, पुणे, अविनाश निकुंभ, जळगाव, बापूराव भास्कर वराडे, आर्किटेक्ट सिद्धार्थ दीक्षित, राजारामपुरी, कोल्हापूर, अर्चना मोहन वाघमारे, घोडेगाव, आंबेगाव, पुणे, अंकुश मुढे, आटपाडी, सांगली, अनिकेत कोळी, मोरा, कोलीवाडा, ता. उरण, रायगड, डॉ. हर्षवर्धन भोसले, रुकडी, ता. हातकणंगले, कोल्हापूर. सर्व विजेत्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांचा उचित सन्मान करण्यात येणार असल्याचे भाई चंद्रशेखर पाटील यांनी सांगितले.