| खालापूर | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्ष हा केवळ एक राजकीय पक्ष नाही, तर पुरोगामी विचारांचा दीपस्तंभ आहे. शेकापची विचारधारा ही समाजाला दिशा देणारी आणि संघर्षाला प्रेरणा देणारी आहे. या दीपस्तंभाची आज काँग्रेसला, महाराष्ट्राला आणि समाजाला पूर्वीपेक्षा अधिक गरज आहे. काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाची मैत्री ही केवळ राजकीय नाही, तर वैचारिक आहे. नियतीने आपल्या हाती दिलेला सत्तांतराचा डाव जिंकायचाच आहे, असा विश्वास महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला.
सपकाळ म्हणाले की, हा विजय सहज मिळणार नाही. त्यासाठी संघर्ष करावा लागेल, त्याग करावा लागेल आणि नव्या उमेदीने, नव्या जिद्दीने पुढे जावे लागेल. अहिंसक मार्गाने लढत लोकशाहीची ही लढाई जिंकायची आहे.
ते पुढे म्हणाले, सत्ता आल्यानंतर सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवणे हेच आमचे ध्येय असेल. प्रत्येक हाताला काम, प्रत्येक उपाशी पोटाला अन्न आणि प्रत्येक गरजवंताला जगण्याचा आधार देण्याची जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे. बेरोजगारी वाढली, हाताला काम मिळाले नाही, तर हातात दगड येण्याची वेळ येते. त्यामुळे रोजगारनिर्मिती हीच खरी राष्ट्रनिर्मिती आहे.
“उषःकाल होता होता काळरात्र झाली… अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली…” या कवितेच्या ओळींचा उल्लेख करत त्यांनी कार्यकर्त्यांना संघर्षाची मशाल तेवत ठेवण्याचे आवाहन केले. शेकाप हा वादळातील दीपस्तंभ आहे. ही विचारधारा जिवंत राहिली, तर पुरोगामी महाराष्ट्रही जिवंत राहील, असे ते म्हणाले.
शेकाप माझ्या आज्याचा पक्ष
भावनिक होत हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, शेकापचे नाव घेतले की मला माझ्या आज्याची आठवण येते. हा पक्ष वाढत राहिला, की माझ्या आज्याच्या कष्टाची, त्यागाची आणि विचारांची आठवण कायम जागी राहते. आज्याला विसरणारा माणूस भूतकाळ विसरतो. ज्या समाजाला, पक्षाला आणि व्यक्तीला स्वतःचा इतिहास माहिती नसतो आणि वर्तमानाचे भान नसते, त्याचे भविष्य अंधारात जाते. म्हणूनच वैचारिक लढाई अधिक ताकदीने लढण्याची गरज आहे.
दलिंदर नाही… तर बिलंदर
पंतप्रधानांचे नाव घेत हर्षवर्धन सकपाळ यांनी आपल्या खास शैलीत टीका केली. मी यापूर्वी दलिंदर हा शब्द वापरला होता. काहींनी माझी जीभ घसरल्याचे सांगितले. मात्र, दलिंदर हा संस्कृतमधील शब्द आहे. पण, आज मी एवढेच म्हणेन, ते केवळ दलिंदर नाहीत, तर एस्पीन फाईलमधले बिलंदर आहेत. अशा प्रवृत्तीला लोकशाहीच्या मार्गाने पराभूत केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. शेकाप हा तुफानातील दिवा आहे. तो पेटता राहिला, तर पुरोगामी विचारांचा प्रकाश कधीही विझणार नाही, असा विश्वास सपकाळ यांनी व्यक्त केला.






