ईरवाडीजवळ रेल्वेच्या धडकेत 12 गायी गतप्राण

। पेण । वार्ताहर ।
पेण ईरवाडी येथे काल दुपारच्या सुमारास चरायला गेलेल्या गायांमधील डझनभर गाया रेल्वेच्या धडकेने मरण पावल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे सर्व गायांच्या कानांना सरकार नोंदणीकृत टॅग(होलमार्क) आहेत.
मात्र एवढया मोठया प्रमाणात गाया रेल्वेच्या धडकेने मरण पावून देखील गायींचे मालक स्वतःहून पुढे यायला मागत नाहीत. यामागील गौडबंगाल काय आहे हे स्थानिकांना समजले नाही. परंतु काही स्थानिकांचे मत आहे या गाई गोशाळेतील आहेत. मात्र रेल्वेकडून कारवाई होईल म्हणून गोशाळेचे मालक आपल्या गायी आहेत हे कबूल करत नाही. एकीकडे गो माता म्हणून आपण पुजा करतो मात्र दुसरीकडे गोशाळेचे मालक स्वतःच्या गायी आहेत म्हणून स्वीकारायला तयार नाहीत. एवढया मोठया प्रमाणात झालेल्या अपघातात गायी मरण पावलेल्या आहेत. त्यांची योग्य विल्हेवाट लावली नाही. तर ईरवाडी गावाचा मोठा आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आल्याशिवाय राहणार नाही. ईरवाडी ग्रामस्थांची मागणी आहे की, गायांच्या कानांना होलमार्क लावलेला आहे. त्यावरून सदर गायांचा मालक कोण याचा शोध घ्यावा आणि मालकावर देखील कारवाई व्हावी.
सदर गाईचे मालक कोण याचा विचारणा करण्यासाठी पेण येथील पशुसवंर्धन अधिकारी डॉ. विष्णु काळे यांच्याशी संपर्क केला असता, सदर गायींच्या कानांना जर टॅग असेल तर त्या टॅगच्या अधारे गाईची प्रजाती व गाईचे वय, गाईचे आरोग्य तसेच मालकाचे नाव सुध्दा आपल्याला उपलब्ध होउ शकते ज्या प्रमाणे माणसांच्या आधारकार्ड वरुन माणसाची सर्व माहिती मिळते तसेच या इअर टॅग वरुन गाईची पुर्ण माहिती मिळू शकते. सदरील टॅग नंबर सर्च केल्यास मालकाची माहिती मिळू शकते.

Exit mobile version