पाच जनावरे जागीच दगावली
। पेण । वार्ताहर ।
शिहू गंगावणे येथील शेतकर्यांवर संकट कोसळले आहे. पाच गुरांना कोंड्यातून विष घालून मारण्यात आल्याने शेतकर्यांची मोठी आर्थिक हानी झाली आहे. याविषयी गंगावणे ग्रामस्थांनी नागोठणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, असे कृत्य करणार्याविरुद्ध ठोस कारवाईची मागणी केली आहे.
गुरे चरायला गेली असता त्यांना कोंड्यामध्ये विष घालून मारण्यात आले असल्याचेदेखील तक्रारी अर्जात नमूद केले आहे. तसेच ज्या व्यक्तीने हा दुषकृत्य केले आहे, त्याचे नाव संशयित म्हणून पोलीस ठाण्यात दिले आहे. मरण पावलेल्या गुरांमध्ये एक बैल, दोन गायी, एक म्हैस, एक रेडा अशा पाच जनावरांचा समावेश आहे. अचानक गुरे दगावल्याने शेतकर्यांना मोठा धक्का बसला आहे. गंगावणे ग्रामस्थांच्या तक्रारीची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, या घटनेचा तपास पोलीस करीत आहेत. तर, प्रांत अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी तलाठ्यांना घटनास्थळी जाऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
ज्या समाजकंटकांनी गुरांना कोंड्यामध्ये विष कालवून खायला दिले आहे. त्याचे पुरावेदेखील घटनास्थळी सापडले आहेत. तरी त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई व्हावी, हीच आमची मागणी आहे.
– मनोहर पारधी, गांगावणे