उद्यापासून बारावीची परिक्षा

49 केंद्रांमध्ये 31 हजार 943 विद्यार्थी बसणार
गैरप्रकार रोखण्यासाठी पाच भरारी पथके सज्ज

| अलिबाग | प्रतिनिधी |

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने एचएससी, म्हणजेच बारावीची परीक्षा बुधवारी 21 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. एकूण 49 केंद्रांमध्ये कला, वाणिज्य, विज्ञान व किमान कौशल्य शाखेतील 31 हजार 943 विद्यार्थी व विद्यार्थिनी परीक्षेस बसणार आहेत. ही परीक्षा 19 मार्चपर्यंत असणार आहे. परीक्षेच्या कालावधीत कोणतीही गैरप्रकार घडू नये म्हणून पाच भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. जिल्ह्यात 12 असंवेदनशील केंद्रे आहेत.

पहिल्या दिवशी सकाळी अकरा ते दोन या वेळेत इंग्रजी विषयाचा पेपर असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. बारावीच्या परीक्षेची तयारी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु होती. परीक्षा कधी सुरु होणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांची प्रतीक्षा लागून राहिली होती. अखेर उत्कंठा संपली असून, 21 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थी सज्ज झाले आहेत. आपले आसन क्रमांक पाहण्यासाठी जिल्ह्यातील वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांमध्ये आदल्या दिवशीपासूनच विद्यार्थ्यांसह पालकांनी गर्दी केली होती.

परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी पाच भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी, बैठे पथक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी यांचा समावेश आहे. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर गैरप्रकार टाळण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, शैक्षणिक संस्थाचे प्रमुख यांची कार्यशाळा 14 ते 15 फेब्रुवारीदरम्यान घेण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक परिरक्षण केंद्र उभारण्यात आले आहे.

Exit mobile version