। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मुंबई, ठाण्याप्रमाणेच रायगडातही पुन्हा कोरोनाने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात 14 जण रुग्ण असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने आणि जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर मोरे यांनी दिली. जेलमध्ये दोन आरोपी पॉझीटीव्ह सापडले आहेत.
रायगड जिल्हा मुंबईला समिप असल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे उभयतांनी सांगितले. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रधान आरोग्य सचिव डॉ. नवीन सोना यांनी व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेत अधिकारी वर्गाला योग्य त्या सुचना केल्या. गेल्या आठवड्यात रायगडात आठ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. तर ही संख्या वाढताना दिसत आहेत. सध्या या सर्वांना होम आयसोलेशनमध्ये ठेवून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. रायगडात पनवेल शहर आणि ग्रामीण भागात हे सर्वाधिक रुग्ण असल्याचे दिसून येत आहे.
वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात बहुदा मास्क सक्ती पुन्हा सुरु केली जाण्याची शक्यता आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. नागरिकांनीही योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. जिल्ह्यात तिसरा बुस्टर डोस सुरु करण्याबाबत शासनाकडे मागणी करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांनी दिली.