। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यावरील विश्वास ठराव संमत झाल्यानंतर बोलताना सर्वात प्रथम हिरकणी वाढीसाठी 21 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे. किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी वाडी येथे गतवर्षी दरड कोसळल्याने मातीचा मोठा ढिगारा गावात आला असल्याने वाडीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे गावातील कुटुंबांना जवळच्या दुसऱ्या वाडीत सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले होते. हे गाव अतिशय डोंगराळ भागात आहे.
याठिकाणी सतत मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे रायगडावरून येणार मोठे दगड गावात येत होते. यामुळे घरांना मोठ्याप्रमाणात तडे गेले असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. महाड शहरापासून जवळपास २५ ते ३० किमी अंतरावर ही हिरकणीवाडी आहे. या दुर्घटनेनंतर येथील ग्रामस्थांकडून मदतीसाठी याचना करण्यात आली होती. त्यानुसार पक्ष प्रतोद भरत गोगावले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हिरकणी वाडीच्या पुनर्वसनासाठी निधीची मागणी केली होती. सदर मागणी मान्य करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यावरील विश्वास ठराव संमत झाल्यानंतर बोलताना सर्वात प्रथम हिरकणी वाढीसाठी 21 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे.