| अलिबाग | प्रतिनिधी |
शासन संरक्षक भिंतींची कामे ही दरडीसारख्या ओढवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी करीत असते. परंतु, मुरूड तालुक्यातील भोईघर येथे संरक्षक भिंतींचे सुमारे 5 कोटींचे काम केवळ धनदांडग्यांच्या मालमत्तांच्या रक्षणासाठी मंजूर करण्यात आले असून ते कामही निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप शिवसेना (उबाठा) जिल्हा युवासेना प्रमुख अमिर उर्फ पिंटया ठाकूर यांनी केला आहे. त्यांनी या बाबतची लेखी तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे ईमेलव्दारे केली आहे.
दरडींमुळे वाहतूक विस्कळीत होणाऱ्या ठिकाणांमध्ये प्रामुख्याने आंबेनळी घाट आणि कशेडी घाट, पोलादपूर, कार्ले खिंड, ताम्हाणी घाट, अंडा पॉईंट, सुकेळी खिंड आणि भिसे खिंड यांचा समावेश असून भोईघरचा यात समावेश नाही. भोईघर येथील विलोभनीय समुद्र किनाऱ्याच्या पार्श्वभुमीवर धनदांडग्यांनी त्यांच्या मालमत्ता खरेदी केल्या आहेत. त्यांच्या मालमत्तांच्या रक्षणासाठी शासन 5 कोटीची संरक्षक भिंत का बांधत आहे, असा सवाल शिवसेना (उबाठा) जिल्हा युवासेना प्रमुख अमिर उर्फ पिंट्या ठाकूर यांनी केला आहे.
शिवसेना (उबाठा) जिल्हा युवासेना प्रमुख अमिर उर्फ पिंट्या ठाकूर यांनी कार्यकारी अभियंता यांना ईमेलवरून पत्र पाठवून मुरूड तालुक्यातील भोईघर येथील संरक्षक भिंतींचे काम केवळ धनदांडग्यांच्या मालमत्तांच्या रक्षणासाठी तसेच अतिशय निकृष्ट दर्जाचे केले असल्याने हे काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये टाकून या कामाचे देयक अदा न करण्याबाबत तक्रार दाखल केली आहे.