| अलिबाग | प्रतिनिधी
अखिल भारतीय आगरी साहित्य संस्थेचे अध्यक्ष कैलास पिंगळे यांच्या मुरुड तालुक्यातील मांडला येथील पिंगळे सिटीतील बांबू हाऊस रिसॉर्टमध्ये साहित्यिक उमाजी केळुसकर यांच्या अध्यक्षतेखाली काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या काव्य संमेलनात महाराष्ट्रातील 30 कवींनी सहभाग घेतला होता. शनिवारी (25 नोव्हेंबर) रोजी या काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
या काव्यसंमेलनासाठी अध्यक्षस्थानी साहित्यिक उमाजी केळुसकर होते, तर प्रमुख पाहुणे नाट्य-चित्र अभिनेते शरद कोरडे, कवी-साहित्यिक चंद्रकांत पाटील, कवी म. वा. म्हात्रे, सुजाता दांडेकर, आयोजक कैलास पिंगळे उपस्थित होते.
याप्रसंगी कवी चंद्रकांत पाटील यांनी काले आयोचे कुशीत ही आगरी भाषेतील कविता, कवी मारुती बागडे यांनी मआदिमातेची रुपेफ ही कविता, कवी म.वा. म्हात्रे यांनी ईर्शाळवाडीचे संकट ही कविता, कवी सुरेश भोपी यांनी आय माझी आगरी बोली ही आगरी भाषेतील कविता, कवी नवनाथ ठाकूर यांनी आईविना घर खाली ही कविता, कवी पां. शि. पाटील यांनी पलटी ही कविता, कवी कैलास पिंगळे यांनी हिरवे रान ही कविता, कवी मंगेश म्हात्रे, आगरी प्रेम ही आगरी भाषेतील गझल, कवी हरिश्चंद्र दळवी यांनी गावठाण ही कविता, कवी राजेंद्र पाटील यांनी चिंधी ते सिंधूताई ही कविता, कवी जयंत पाटील यांनी कणगा ही कविता सदर केली. प्रमुख पाहुणे शरद कोरडे यांनी लावणी सादर करुन उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी मांडला ग्रामपंचायतीचे सरपंच ऋतिक नागोटकर, दिशा नांदगावकर, ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या उपाध्यक्षा चारुशिला कोरडे, ज्येष्ठ छायाचित्रकार सुरेश खडपे आदींचा सत्कार करण्यात आला.







