जनसंवाद यात्रेतून उद्धव ठाकरे कडाडले
| माणगाव | प्रतिनिधी |
रायगड लोकसभेसाठी अनंत गीते तर श्रीवर्धनमधून अनिल नवगणे व महाडमधून स्नेहल जगताप विधानसभेचे उमेदवार असल्याचे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी माणगाव येथील जनसंवाद सभेत बोलताना जाहीर केले. विरोधकांकडे धनशक्ती असली तरी आमच्याकडे जनशक्ती असून, अब की बार तडीपार…., रायगडातील आमच्या जनसंवाद सभेस जनतेने दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता विरोधकांना व गद्दारांना येणार्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत धडा शिकविल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिला. रायगडच्या टकमक टोकावरुन या गद्दारांचा कडेलोट करा, अशा हल्लाबोलही ठाकरे यांनी केला. या सभेला मुस्लिम बांधवही मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने याची चर्चा माणगाव तालुक्यासह सर्वत्र सुरु होती.
लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर माणगावात शिवसेनेची जनसंवाद सभा शुक्रवार दि. 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजता एकता पेट्रोल पंपाशेजारील मैदानात आयोजित करण्यात आली होती. या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले. या सभेला माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, माजी मंत्री सुभाष देसाई, माजी मंत्री भास्कर जाधव, माजी आ. संजय कदम, विधानसभेचे गटनेते अजय चौधरी, उपनेते विजयराव कदम, दक्षिण रायगड शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, संपर्क प्रमुख संजय कदम, महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप, सीताराम मेस्त्री, तालुका प्रमुख गजानन अधिकारी, राजिपचे माजी उपाध्यक्ष बाळकृष्ण राऊळ, नगरसेवक अजित तारळेकर, तालुका संपर्क प्रमुख बळीराम घाग, नंदू शिर्के, सुजित तांदळेकर, पदमाकर मोरे, आशिष पळसकर आदींसह शिवसैनिक, महिला संघटिका, नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी विरोधी भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर जोरदार टीका केली. ते म्हणाले पंतप्रधान बोलून गेले आम्हाला घराणेशाही नको त्यांच्या या वक्तव्याचे मी स्वागत करतो. मोदींना सर्वेसर्वा मानणारे तटकरे यांनी मोदींचा मान ठेवून आतातरी घरी बसावे. पंतप्रधानांनी राम मंदिराचे लोकार्पण घाईगडबडीत निवडणूक नजरेसमोर ठेवून केले. मुंबई-गोवा महामार्ग केंद्र सरकारच्या अखत्यारीत असतानाही या रस्त्याचे काम अजून पूर्ण झालेले नाही. आता पंतप्रधान पुन्हा पुन्हा रायगडात येत आहेत. संकटकाळात पंतप्रधान कधी आले नाही. आम्ही कधीच हिंदुत्व सोडलेले नाही. हिंदुत्व त्यांनी सोडले. घराघरात भांडणे लावणे व पक्ष फोडण्याचे काम त्यांनी केले. गद्दारांनी आमचा पक्ष चोरला, माझे वडील चोरले, हे जन्माला आले यांना आई- वडील होते की नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
भ्रष्टचार करा, मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री व्हा, हि मोदींची गॅरेंटी, 25 वर्ष एकत्रित राहून शिवसेनेची भाजप झाली नाही मग शिवसेनेची काँग्रेस कसा होणार? गद्दारांचा रायगडच्या टकमक टोकावरून कडेलोट करा, असा हल्लाबोलही ठाकरे यांनी केला. यावेही माजी केंद्रीय मंत्री अनंत गीत, माजी मंत्री भास्कर जाधव यांनीही सरकारचा समाचार घेतला. दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे म्हणाले कि, येणार्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत गद्दारांना आपल्याला त्यांची जागा दाखवून देऊन उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करायचे आहेत. महाडच्या माजी नगराध्यक्ष नेहाला जगताप म्हणाल्या की, येणार्या काळात शिवसेना माणगाव तालुक्यात नंबर 1 चा पक्ष होईल. या जनसंवाद सभेत खा. तटकरे यांचे निकटवर्तीय माणगाव पंचायत समितीचे माजी सभापती प्रभाकर उभारे यांचे सुपुत्र डॉ. अमेय उभारे व त्यांचे सहकारी तसेच उपविभागप्रमुख मधुकर नाडकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.