| चौल | प्रतिनिधी |
सरकारी नोकरी मिळावी यासाठी रात्रंदिवस जागून कठोर परिश्रम घेणारे तरुण खुर्चीवर बसताच पैशांच्या मागे लागत आहेत. गेल्या वर्षभरात म्हणजेच दि. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत झालेल्या कारवायांवरुन हे सिद्ध झाले आहे. असाच पैशांचा मोह न आवरणारे संपूर्ण ठाणे परिक्षेत्रात 144 आरोपी असून, त्यातील रायगड जिल्ह्यातील 18 सरकारी बाबू वर्षभरत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. तरुण वयातील चौघांना, तर उतरत्या वयातही 26 लोकांना बेड्या ठोकण्यात यश आले आहे. लाचेची सर्वाधिक प्रकरणे महसूल आणि पोलीस खात्यातून उघडकीस आली आहेत.
मागील काही वर्षांपासून जिल्ह्यात पैसे घेऊन काम करणाऱ्या सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे. महसूल, शिक्षण, पोलीस, महापालिका, नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषदेत असे प्रकार सर्रासपणे सुरू असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मागील वर्षभराच्या कारवाईतून स्पष्ट होते. अगदी हजार रुपयांपासून ते तीन लाखांपर्यंत लाच घेताना हे लोकसवेक एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत; परंतु दुर्दैव म्हणजे यात 20 ते 40 वर्षे वयोगटातील 37 लोकांचा यात समावेश आहे.
सध्या शासकीय नोकरीसाठी जीवघेणी स्पर्धा आहे. अशा स्थितीतही कठोर परिश्रम घेऊन हे तरुण सरकारी खुर्चीवर बसतात. आपण चांगले काम करुन सामान्यांची सेवा करण्यासह प्रामाणिक कर्तव्य बजावण्याचे ध्येय उराशी ठेवतात; परंतु, शासकीय नोकरी मिळाल्यानंतर काही दिवसांतच त्यांना पैशांचे आमिष लागते अन् हळूहळू लाच घेण्यास सुरुवात करतात.
जिल्ह्यात गेल्या वर्षभरात सात तरुण अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाचेची मागणी करीत ती स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडले आहे. त्यांना बेड्याही ठोकण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्वच सरकारी कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बिनशर्त जनतेची कामे करणे अपेक्षित आहे. मात्र, हे कर्मचारी प्रत्येक काम करण्यासाठी काही ना काही चिरीमिरी घेण्यासाठी अडवणूक करुन जनतेचा छळ करतात, अशी अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत. सरकारी यंत्रणा भ्रष्टाचाराच्या रोगाने ग्रासलेली असल्याचे चित्र लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून मिळालेल्या माहितीवरुन स्पष्ट होत आहे.
निवृत्तीच्या उंबरठ्यावर पैशाचा हव्यास भोवला
तरुणांबरोबरच नोकरीतून निवृत्त होण्याच्या काही दिवस अगोदरही काही लोकसेवक लाचेची मागणी करतात. अशा 51 ते 60 वर्षे वयोगटातील 26 लोकांना सापळा रचून बेड्या ठोकण्यात ठाणे परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यश आले आहे.
वयोगटानुसार लाचखोरीची आकडेवारी
20-30 वयोगटः- 10
31-40 वयोगटः- 50
41-50 वयोगटः- 41
51-60 वयोगटः- 36
रायगड जिल्ह्यात 18 कारवाया
जिल्ह्यात वर्षभरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वर्षभरात तब्बल 18 कारवाया केल्या आहेत. यात 20 ते 30 वयोगटातील दोन, 31 ते 40 वयोगटातील पाच, 41 ते 50 वयोगटातील पाच तर, सर्वाधिक 51 ते 60 वयोगटातील सहा जणांचा समावेश आहे. संपूर्ण हयात सरकारी नोकरीत घालवल्यानंतर उरलीसुरली इज्जत वेशीला टांगण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे.
गेल्या काही वर्षांत सरकारी कर्मचारी लाच घेण्याच्या प्रकरणात वाढ झाली आहे. परंतु, आरोपी कोणीही असो, तक्रार आल्यानंतर तात्काळ सापळा लावून कारवाई केली जात आहे. गेल्या वर्षभरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करुन 18 गुन्हे उघडकीस आणले असून, आरोपींना ताब्यात घेतले आहे. अधिकारी क्लास वन असो वा शिपाई जर सामान्यांकडून लाचेची मागणी करीत असेल, तर तक्रारदारांनी त्यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी पुढे यावे. यासाठी आमच्या 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
शशिकांत पाडावे, उपअधीक्षक,
रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभाग