प्रकाश आंबेडकरांनी केला आरोप
| अकोला | वृत्तसंस्था |
राष्ट्रीय स्वंयसेवक संघ म्हणजेच आरएसएस व्यक्तीविरोधी आहे. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपचे नाव मिटवले, आरएसएस संपविली, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. यवतमाळच्या वणी येथे चंद्रपूर आर्णी मतदारसंघाचे उमेदवार राजेश बेले यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, आरएसएस व्यक्तीविरोधी आहे, परंतु मोदींनी भाजपचे नाव मिटविले, आरएसएस संपविली, कारण दीड वर्षात ते मोहन भागवतांना भेटायला गेले नाहीत. भागवतांनी वेळ मागूनही ती दिली नाही. पक्ष टिकले तर देशाचा एकोपा टिकतो त्यामुळे संघ व सनातन वाद्यांनी मोदींचं भूत मानगुटीवरून उतरविण्यासाठी मदत करावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, राहुल गांधींचा मॅच फिक्सिंगचा अर्थ वेगळा होता. पण इथे काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी भाजप बरोबर बसून मॅच फिक्सिंग केली, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. यात नांदेड, भंडारा-गोंदिया, कल्याण, रावेर हे मॅच फिक्सिंगचे मतदारसंघ असून त्याची यादी आपण देऊ शकतो, असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने स्वतःमध्ये बदल केले नाही तर, त्यांची इतर राजकीय संघटना आणि पक्षांसारखीच वाताहत होणार आहे. लोकशाही आणि उमेदवारीचे सामाजिकरण होणं आवश्यक आहे. त्यासाठी वेगवेगळ्या समाज घटकातल्या लोकांना आम्ही उमेदवारी दिली. यामुळे जातीवादी राजकारणाला चाप बसू शकेल, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
अकोला लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने अध्यक्ष प्रकाश आंबेडकर निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीसाठी आयोगाकडून त्यांना प्रेशर कुकर हे चिन्ह मिळालं आहे. अकोल्यात वंचित, भाजप आणि काँग्रेस अशी तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांची लढत ही भाजपचे अनुप धोत्रे आणि काँग्रेसचे अभय पाटील यांच्याशी होणार आहे.





