। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत अविष्का महेश घरत हिने ठाणे जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे. अविष्का ही ज्ञान विकास संस्था कोपरखैरणे या विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. यापूर्वी तिने प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 87.33% गुण मिळवून नवी मुंबई विभागात प्रथम क्रमांक पटकाविला होता.
एनएमएमएस स्कॉलरशिप परीक्षेत अविष्का घरतने मिळविलेल्या या घवघवीत यशात सारिका देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. या परीक्षेत ज्ञान विकास विद्यालयाचे ओमकार काळे, वैष्णवी संतोष शेलार, शिवराज चटाले, सत्यवान धापते, आयुष सोलंकर, रसिका शेळके, दिशा महाले हे विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आली होती. या परीक्षेत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना पाच वर्षासाठी तब्बल साठ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.