खोली-रुंदी वाढल्याने पुराचा वेढा सुटणार
| रत्नागिरी | प्रतिनिधी |
पाटबंधारे विभागातर्फे कोंढेतड पूल ते मुंबई-गोवा महामार्गावरील अर्जुना नदीवरील पूल या पसिरातील अर्जुना नदीपात्रातील गाळाचा उपसा करण्यात आला आहे. महसूल विभाग, राजापूर नगरपालिकेचे सहकार्य आणि लोकसहभागातून नाम फाऊंडेशनच्या पुढाकाराने गतवर्षी अर्जुना-कोदवली नदीपात्रातील गाळ उपसा करण्यात आला होता. लाखो क्युबिक घनमीटर गाळ उपसा केल्याने नदीपात्राची खोली वाढली असून, रुंदावलेल्या पात्रामुळे दरवर्षीच्या तुलनेमध्ये गतवर्षी राजापूरला कमी प्रमाणात पुराची झळ पोहचली होती.
यावर्षीही पाटबंधारे विभागातर्फे कोंढेतड पूल ते मुंबई-गोवा महामार्गावरील अर्जुना नदीवरील पूल या पसिरातील अर्जुना नदीपात्रातील गाळाचा उपसा करण्यात आला आहे. त्यामध्येही सुमारे एक लाख घनमीटर गाळाचा उपसा झाला आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या पूरस्थितीची तीव्रता कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गाळ उपशामुळे अर्जुना-कोदवली नद्यांची पात्रांची खोली वाढताना त्यांची रुंदीही वाढली होती. त्याप्रमाणे यावर्षी झालेल्या गाळ उपशामुळे अर्जुना नदीपात्राची रूंदी वाढली आहे. गाळ उपशापूर्वी अनेक ठिकाणी या नदीपात्राची सुमारे 25 ते 30 मीटर रुंदी होती. गाळ उपशानंतर तिचे नदीपात्र सुमारे 50 ते 60 मीटर रुंद झाल्याचे दिसून येते. त्यामुळे गाळाने भरलेले अरुंद दिसणारे अर्जुना नदीचे पात्र आता मोकळे आणि विस्तीर्ण झाल्याचे दिसून येते.
सुरुवातीला पुराचे पाणी वाढून त्याचा शहराला वेढा पडत होता. वाढलेली खोली आणि रुंदावलेल्या नदीपात्रांमुळे पावसाळ्यामध्ये वाढणारे पाणी सुरळीतपणे समुद्राकडे वाहून जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, तरीही अतिवृष्टीवेळी पूरस्थिती निर्माण झाली तरी पूर्वीसारखे पुराचे पाणी दोन-दोन दिवस राहण्याची शक्यता कमी आहे. गेल्यावर्षी गाळ उपशानंतर पुराच्या पाण्यामध्ये घट झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे यावर्षी अर्जुना नदीपात्रामध्ये झालेल्या गाळ उपशाने त्याला अधिक बळकटी मिळणार आहे. अर्जुना नदीतील गाळ उपसा गतवर्षी कोदवली नदीतील नद्यांचा संगम परिसर असलेला बंदर धक्का ते आंबेवाडी परिसर इथपर्यंतच्या गाळाचा उपसा झाला होता. त्याचवेळी अर्जुना नदीपात्रातील संगम परिसर ते कोंढेतड पूल या परिसरातील सुमारे दोनशे मीटर परिसरातील गाळाचा उपसा झाला होता. त्यानंतर यावर्षी अर्जुना नदीपात्रातील कोंढेतड पूल ते अर्जुना नदीवरील मुंबई-गोवा महामार्गावरील पूल या दरम्यानचा शिल्लक राहिलेल्या गाळाचा उपसा करण्यात आला आहे. गाळ उपशामुळे वरचीपेठ परिसरामध्ये पुराचे वाढणारे पाणी कमी होण्यास वा पुराची तीव्रता कमी होण्यास एकप्रकारे मदत होणार आहे.