। न्युयॉर्क । वृत्तसंस्था ।
टी-20 विश्वचषकामध्ये पाकिस्तान संघाची कामगिरी खुपच खराब राहिली आहे. त्याने आपल्या प्रवासाची सुरुवात यूएसए विरुद्ध खेळून केली, ज्यामध्ये बाबर आझमच्या संघाला सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्याचवेळी, रविवारी बाबर आझमच्या संघाला स्पर्धेतील 19व्या सामन्यात भारताकडून 6 धावांनी दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. सलग दोन सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर पाकिस्तानवर आता स्पर्धेतून बाहेर होण्याचा धोका आहे.
सुपर-8च्या भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यात उत्साहाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या, ज्याचा क्रिकेटप्रेमींनी चांगलाच आनंद लुटला. मात्र, या दोन संघांमधील आणखी एक सामना या स्पर्धेत होऊ शकतो. जवळपास हे शक्य आहे पण त्यासाठी काही गोष्टी पाकिस्तानच्या बाजूने जाणे आवश्यक आहे.विशेष म्हणजे यावेळी या स्पर्धेत 20 संघ सहभागी झाले असून त्यांची 4 गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटात 5-5 संघ आहेत. ग्रुप स्टेज संपल्यानंतर केवळ 8 संघ दुसर्या फेरीसाठी पात्र ठरतील. याचा अर्थ प्रत्येक गटातून दोनच संघ पुढच्या टप्प्यात प्रवेश करतील. दुसरी फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानला आगामी दोन सामन्यांमध्ये कॅनडा आणि आयर्लंडविरुद्ध मोठे विजय मिळवावे लागतील जेणेकरून त्यांचा नेट रन रेट चांगला होईल. त्याचबरोबर भारतीय संघ आणि आयर्लंड यांनाही आपापल्या सामन्यात यूएसएचा पराभव केला पाहिजे. यानंतर जर पाकिस्तानचा नेट रन रेट अमेरिकेपेक्षा चांगला असेल तर त्यांना सुपर-8 मध्ये प्रवेश मिळेल.