। लाहोर । वृत्तसंस्था ।
टी-20 विश्वचषकात रविवारी झालेल्या भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यात भारताचा 6 धावांनी विजय झाला. पाकिस्तान बाजी मारेल असे वाटत असताना भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजांनी चोख भूमिका बजावली. पाकिस्तानच्या या पराभवानंतर मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर टीका केली जात आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमन निशाणा साधला आहे. पाकिस्तानच्या संघातील खेळाडू गेल्या 10 वर्षांपासून क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे मी त्यांना काही शिकवू शकत नाही. जसप्रीत बुमराह विकेट घेण्यासाठीच गोलंदाजीसाठी आला होता, हे मोहम्मद रिझवानला माहिती नाही का? बुमहार गोलंदाजीसाठी आल्यानंतर रिझवानने सावध राहायला हवे होते. मात्र, मोठा फटका मारायला गेला आणि तो बाद झाला, इफ्तिखार अहमदने देखील हेच केले, असं वसीम अक्रम म्हणाला. पाकिस्तानच्या संघातील खेळाडू एकमेकांसोबत जास्त बोलत नाही. हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट आहे आणि तुम्ही तुमच्या देशासाठी खेळत आहात. या खेळाडूंना घरी बसवण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानच्या खेळाडूंना शत्रूची गरज भासत नाही. कारण की ते स्वत:च त्यांचे शत्रू आहेत. भारताला पराभूत करण्यासाठी पाकिस्तानी फलंदाजांकडे खूप वेळ होता पण त्यांना ते जमले नाही. पाकिस्तानी संघाकडे कोणती रणनीतीच नसल्याने पराभव स्वीकारावा लागला, असंही वसीम अक्रमने सांगितले.