। नेरळ । प्रतिनिधी ।
कळंब ग्रामपंचायतीमधील सुतारपाडा या गावातील कातकरी वाडीमधील आदिवासी लोक आजही कुडामेडीच्या घरात राहत आहेत. वरची वाडी म्हणून परिचित असलेल्या वाडीमधील त्या कुटुंबांचा मागील तीन वर्षापासून घरकुल मिळावे म्हणून लढा सुरु असून ग्रामपंचायत या आदिवासी कुटुंबांना घरकुल देण्यात अयशस्वी ठरली आहे. दरम्यान त्या कुटुंबाला शासन घरकुल देणार आहे किंवा नाही असा सवाल सामाजिक कार्यकर्ते दीपक बोराडे यांनी उपस्थित केला आहे.
गीता पारधी या आपल्या दोन मुलांसह सुतारपाडामधील वरची वाडीमध्ये राहतात. या कुटुंबाने मागील 15 वर्षे सातत्याने घरकुल मिळावे म्हणून सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवले आहेत. या आदिवासी कुटुंबाला ग्रामपंचायतीकडून अद्याप हक्काचे घर मिळाले नाही. घरकुल मिळावे यासाठी गीता पारधी या आदिवासी महिला धावपळ करीत असून पतीचे निधनानंतर त्या कुटुंबाचा गाडा सांभाळत आहेत. या कुटुंबाच्या घराच्या आसपास सरपटणारे प्राणी यांचा वावर असतो आणि त्यांचा धोकादेखील या कुटुंबाला सतत असतो.त्यामुळे अशा कुटुंबाला घरकुल द्यावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते दीपक बोराडे यांनी सरकारी दरबारी पाठपुरावा करण्यासाठी सुरुवात केली आहे.