बाजारमुख्य रस्त्यावर रोज अपघात
। पनवेल । वार्ताहर ।
कळंबोली वसाहतीमधील लोखंड आणि पोलाद बाजार समितीच्या अंतर्गत रस्त्यावर प्रवेश करणार्या अवजड वाहनांकडून बाजार समिती टोल वसुल करते. मात्र, त्या बदल्यात कोणत्याही सोई सुविधा उपलब्ध करून देत नाही परिणामी बाजार समिती परिसरात असलेले पाथदिवे बंद असल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य आहे. त्यामुळे अनेकांचे बळी गेले असून सोमवारी एका पादचार्याला ट्रेलरने अक्षरश: चिरडले. त्यामुळे आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी बाजार समिती कार्यालयावर धडक मारत संबंधितांना जाब विचारत दोन दिवसात कार्यवाही न झाल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.
स्टील मार्केटमधील अंतर्गत रस्त्यांवर लावण्यात आलेले पथदिवे रात्रीच्या वेळी बंद असतात. विशेष करून फेरी म्हणजे मुख्य रोडवरील स्ट्रीट लाईटची बत्ती कायम गुल असते. त्यामुळे अंधाराचे साम्राज्य निर्माण होऊन विशेष करून आरटीओ कार्यालयातील बिमा संकुल चौक या परिसरात मोठ्या प्रमाणात अपघात घडतात. दुचाकीस्वार आणि रस्ता ओलांडणार्यांचे नाहक बळी या ठिकाणी जात आहेत. सोमवारी रात्री अंधारामुळे वाहन आल्याचे न दिसल्यामुळे एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. त्याला ट्रेलरने चिरडले असे लहान मोठे अपघात या भागामध्ये सर्रास घडत आहेत. त्याचबरोबर भरधाव वेगाने जाणार्या आणि येणार्या अवजड वाहनांना या ठिकाणी कोणताही अटकाव नाही. त्यामुळे गतिरोधक बसवण्याची शिवसेनेची सुरुवातीपासूनची मागणी आहे. मात्र याबाबत बाजार समिती कोणतीही दखल घेत नाही. परिणामी पेरी फेरी रोड मृत्यूचा सापळा बनला आहे. असे असताना स्टील मार्केट व्यवस्थापनाचे डोळे उघडत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. बाजार समिती आणखी किती जणांचा बळी या रस्त्यावर देणार आहे असा थेट सवाल शिवसेनेकडून करण्यात आला आहे. याशिवाय अंधाराचा फायदा घेऊन वाहनांमधील डिझेल आणि इतर वस्तूंच्या चोर्यांमध्ये वाढ झालेली आहे.
वाहन चालकांनासुद्धा अंधाराचा फायदा घेऊन मारहाण केली जाते. याला लोह-पोलाद बाजार समितीचा निष्क्रिय कारभार आणि दुर्लक्षितपणा जबाबदार आहे. त्याचबरोबर रात्री या रोडवर तृतीयपंथीयांचाही वावर वाढल्यामुळे मागील आठवड्यात खिडुकपाडा येथील महिला भगिनींना थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले. यालासुद्धा बर्याच अंशी बाजार समिती कारणीभूत आहे.
या संदर्भात 1 जानेवारी 2025 रोजी शिवसेनेचे कळंबोली शहर प्रमुख तुकाराम सरक यांनी लोह पोलाद बाजार समितीला पत्रसुद्धा दिले होते. याबाबत कार्यवाही झाली नाही. त्यांच्या उडवा उडवीमुळे निष्पाप लोकांचा जीव जात आहे. म्हणून मंगळवारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांचे नेतृत्वाखाली थेट सुविधा केंद्रातील बाजार समितीच्या कार्यालयावर धडक मारण्यात आली. शिवसैनिकांचा आक्रमक बाणा पाहिल्यानंतर या ठिकाणची कर्मचारी आणि अधिकार्यांची पाचावर धारण बसली.
दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित नसल्याने जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी जिल्हाप्रमुखांशी फोनवर चर्चा केल्यानंतर आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली. पथदिवे दोन दिवसाच्या आतमध्ये सुरू करावेत, त्याचबरोबर अपघात होणार्या ठिकाणी विशेष करून मारुती चेंबर आणि बिमा कॉम्प्लेक्स येथे स्पीड ब्रेकर बसवण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली.
प्रतिबंधात्मक उपाययोजना न झाल्यास आंदोलन
कळंबोली स्टील मार्केटच्या कार्यालयात धडक मारल्यानंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली थेट कळंबोली पोलीस ठाणे गाठले. बाजार समितीच्या दुर्लक्षितपणामुळे दररोज होणारे अपघात आणि त्यामुळे जाणारे बळी ही वस्तुस्थिती पोलिसांच्या नजरेत आणून देण्यात आली. याबाबत जर प्रतिबंधात्मक उपाययोजना झाल्या नाही तर तीव्र आंदोलन जिल्हाप्रमुखांच्या नेतृत्वाखालील छेडण्यात येईल असा इशारा शहर प्रमुख तुकाराम सरक यांच्यासह इतर शिवसैनिकांनी दिला. त्यावेळी जरी आपण आमच्यावर गुन्हे दाखल केले तरी मागे हटणार नाही अशा प्रकारचा इशारा यावेळी देण्यात आला.







