सागरी महामंडळाने कसली कंबर
| मुंबई | प्रतिनिधी |
कोकणवासीयांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. मुंबई ते कोकण या दरम्यान प्रवासी व वाहनांसाठीची रो-रो फेरी सेवा दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू करण्याची तयारी सुरू असून, सागरी महामंडळाने कंबर कसली आहे. काही महिन्यांपासून केंद्र व राज्यस्तरीय परवानग्या, हवामान अडथळे आणि तांत्रिक कारणांमुळे ही सेवा वारंवार पुढे ढकलली जात होती. गणेशोत्सवात ही सेवा सुरू होईल, अशाप्रकारे नियोजन सुरू होते, मात्र आता सर्व परवानग्या मिळाल्या असून, समुद्रस्थितीही अनुकूल होत आहे. त्यामुळे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरच उद्घाटनाचा सरकारचा मानस आहे.
अशी सुरू आहे प्रशासनाची तयारी
सागरी महामंडळाने बोटीची सेवा सुरुवात करण्यासाठी तांत्रिक व प्रशासनिक तयारी पूर्ण केली आहे. जेट्टीवर प्रवाशांसाठी बैठकीची सोय, वाहनांसाठी स्वतंत्र लोडिंग-विचार केंद्र, तसेच सुरक्षित उतार व चढाव यासाठी योग्य उपाययोजना केली जात आहे. जयगड आणि विजयदुर्ग येथे जेट्टीवरून शहरात जाण्यासाठी बस सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच हवामान अहवालावर नजर ठेवून समुद्रस्थिती अनुकूल असल्यास ताबडतोब सेवा सुरू करण्याचे प्रशासनाकडून नियोजन सुरू आहे.
प्रवाशांना दिलासा
सणासुदीच्या काळात हजारो प्रवासी कोकणात आपल्या गावी जाण्यास निघतात. महामार्गावर तासन्तास होणारी वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका, रेल्वेत तिकिटासाठीची धावपळ यामुळे प्रवास नेहमीच त्रासदायक ठरत होता. रो-रो सेवेमुळे सुरक्षित, जलद आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय मिळणार आहे.
कोकणवासीयांचा उत्साह
गणेशोत्सवात सेवा न मिळाल्याने नाराजी होती, पण नवरात्रोत्सवात ही सेवा सुरू होणार असल्याचे ऐकून आम्हाला खूप आनंद झाला आहे. आता मुंबई ते कोकण प्रवासाला नवा पर्याय मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया रत्नागिरी व सिंधुदुर्गातील प्रवाशांनी दिली.
सेवा कशी असेल?
भाऊचा धक्का (मुंबई) येथून जयगड आणि विजयदुर्गपर्यंत या बोटी धावणार आहेत.
प्रवास वेळ : मुंबई - रत्नागिरी 3 ते 3.5 तास, मुंबई-सिंधुदुर्ग 5 तास
वेग : 25 नॉट्स दक्षिण आशियातील सर्वात वेगवान प्रवासी बोट.
यशस्वी चाचणी
मुंबई ते रत्नागिरी-सिंधुदुर्ग मार्गावर रो-रो सेवेची प्रायोगिक चाचणी यशस्वीरीत्या पार पडली. वेग, प्रवासी क्षमता व सुरक्षा तपासणी समाधानकारक ठरली असून, सागरी सुरक्षा यंत्रणांकडूनही हिरवा कंदील मिळाला आहे.आसन क्षमता552 प्रवासी (इकोनॉमी )44 (प्रीमियम इकोनॉमी)48 (बिझनेस)12 (फर्स्ट क्लास)वाहन क्षमता : 50 चारचाकी व 30 दुचाकी.
तिकीटदर
इकोनॉमी - 2,500 रु.
प्रीमियम इकोनॉमी - 4,000 रु.
बिझनेस - 7,500 रु.
फर्स्ट क्लास - 9000 रु.
वाहनांचे दर
चारचाकी - 6000 रु.
दुचाकी - 1000 रु.
सायकल - 600 रु.
मिनी बस - 13,000 रु.







