उत्पादन शुल्क विभागाचे डोळ्यावर हात
। सुधागड-पाली । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यात अनेक ठिकाणी अवैधरीत्या गावठी दारूची निर्मिती व विक्री राजरोसपणे सुरू आहेत. मात्र पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे याकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. या गावठी अवैध दारू धंद्यांमुळे अनेक कुटुंब उध्वस्त होत आहेत. त्यामुळे हे गावठी दारू धंदे त्वरित बंद करण्यात यावेत अशी मागणी बुधवारी (ता.10) अखिल भारतीय आदिवासी परिषदेचे कोकण संघटक रमेश पवार यांनी जांभूळपाडा येथे केली.
रमेश पवार म्हणाले की गावठी दारूमुळे अनेक कुटुंब उध्वस्त होत आहेत. याचा सर्वात जास्त परिणाम आदिवासी समाजावर होत आहे. कौटुंबिक हिंसाचार वाढले आहेत. तसेच ही अवैध गावठी दारू रासायनिक प्रक्रिया करून बनवण्यात येते त्यामुळे त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो. म्हणूनच हे अवैध गावठी दारू धंदे बंद करावेत अशी मागणी देखील रमेश पवार यांनी केली आहे.
रायगड जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाला शहर व ग्रामीण भागात चालणारे अवैध गावठी दारूचे अड्डे दिसत नाहीत काय ? असा सवाल देखील अनेक नागरिक व समाजसेवकांनी केला आहे.
रायगड जिल्हात डोंगर वाड्या वस्तीत व आसपासच्या जंगलांमध्ये गावठी दारू गाळली व विक्री केली जाते. गावठी दारूच्या अवैध विक्रीवर कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत. त्यापेक्षा अधिक अधिकार उत्पादन शुल्क (एक्साईज) विभागाला आहेत. परंतु अवैध मद्य वाहतूक, विक्री रोखण्यात या विभागाची समाधानकारक कारवाई अद्याप झालेली दिसत नाही. असे काही नागरिकांचे म्हणणे आहे.
सुधागड तालुक्यातील पाली येथे 2008 मध्ये झालेल्या स्पिरीट कांडात 26 जणांचा बळी गेला होता. या दारूकांडाचा अभ्यास केला तर यात बाधित होणारा समाज हा बहुतांशी आदिवासी समाज होता. व्यसनाधीनता आणि गरिबी यामुळे गावठी, हातभट्टीसारख्या दारूच्या आहारी हा समाज गेल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता अशा अवैधरीत्या उत्पादित होणार्या दारू विरोधात व्यापक कारवाई होणे गरजेचे आहे. चौकट 1
घातक रसायनाचा वापर
सुरवातीला अवैध गावठी दारू तयार करण्यासाठी नवसागर व काळा गूळ यांसारख्या घटकांचा वापर केला जात होता. मात्र अलीकडच्या काळात मात्र गावठी दारू तयार करण्यासाठी घातक रसायने, रंगाचे डबे, बॅटरीचे सेल यांचाही वापर होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ही दारू मानवी शरीरासाठी अत्यंत घातक आहे.